
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
नवी दिल्ली :- नेताजी सुभाषचंद्र बोस बरोबर 78 वर्षांपूर्वी 19 डिसेंबर 2021 रोजी सकाळी साडेअकरा वाजता अंदमान निकोबार बेटावर आले होते. त्यांच्या या भेटीचा अविस्मरणीय क्षण जतन करण्यासाठी आजच्याच दिवशी, अंदमान निकोबार विभागाचे प्रमुख, कमांडर इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय सिंह यांच्या हस्ते एक ‘संकल्प स्मारक’ आज देशाला समर्पित करण्यात आले. हे स्मारक म्हणजे, नेताजींच्या इंडियन नॅशनल आर्मी (आयएनए) – आझाद हिंद फौज च्या सैनिकांना आणि त्यांच्या अतुल्य बलिदानांना वाहिलेली आदरांजलीच नाही, तर नेताजींनी स्वतः आपल्याला शिकवलेल्या ‘निश्चय, कर्तव्य आणि बलिदान’ या मूल्यांचे जतन करणारे हे स्मारक आहे. भारतीय सैन्यदलांची ओळख अधोरेखित करणारी आणि त्यांचा दृढनिश्चय व्यक्त करणारी ही मूल्ये कायमच त्यांना प्रेरणा देत राहतील.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या गौरव गाथेत, 30 डिसेंबर 1943 या दिवसाला विशेष महत्त्व आहे. याच दिवशी पोर्ट ब्लेअर इथे पहिल्यांदा भारताचा राष्ट्रध्वज फडकला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस, 16 जानेवारी 1941 रोजी ब्रिटिशांच्या नजर कैदेतून निसटले होते, आणि त्यानंतर तब्बल तीन वर्षांनी त्यांनी भारतभूमीत, पोर्ट ब्लेअरच्या विमानतळावर 29 डिसेंबर 1943 रोजी सकाळी साडे अकरा वाजता पहिले पाऊल ठेवले. त्याच्या दुसऱ्या दिवशी, 30 डिसेंबरला त्यांनी या भूमीवर तिरंगा फडकावला.
आझाद हिंदच्या प्रांतिक सरकारचे प्रमुख आणि आयएनएचे सर्वोच्च लष्करप्रमुख म्हणून, या बेटावर नेताजींनी दिलेली भेट म्हणजे, एकप्रकारे, ‘ आझाद हिंद सेना 1943 च्या अखेरपर्यंत, भारत भूमीवर उभी असेल’ या नेताजींच्या वचनाची पूर्तताच होती.त्यांच्या या ऐतिहासिक भेटीतच, अंदमान निकोबार बेटे, हा भारताचा पहिला स्वतंत्र प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आली.
ज्या ठिकाणी नेताजींचे 29 डिसेंबर 1943 रोजी आगमन झाले होते ( त्यांच्यासोबत त्यावेळी सर्वश्री आनंद मोहन सहाय (सचिव), कॅप्टन रावत-एडीसी आणि कर्नल डीएस राजू 9 त्यांचे वैयक्तिक डॉक्टर हे ही होते) ती जागा आज अंदमान निकोबार मधील एअर स्टेशन- आयएनएस उत्कर्षच्या परिसरात आहे.
तिथल्या सध्याच्या धावपट्टीच्या जवळ हे स्थान आहे.जपानी हवाई दलाच्या लढाऊ विमानातून, आयएनए चे सर्वोच्च लष्करप्रमुख म्हणून नेताजी इथे आल्यावर त्यांना आझाद हिंद सेनेने लष्करी मानवंदना दिली होती. आज या निमित्त झालेल्या विशेष समारंभात, भारताच्या एकमेव क्वाड सेवांच्या सैनिकांनी कमांडर इन चीफ यांच्या नेतृत्वाखाली इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत कुटुंबांसहित, आयएनएच्या सैनिकांच्या बलिदानाला आदरांजली वाहिली. या प्रसंगाची प्रतिष्ठा कायम राखत, अतिशय साध्या पद्धतीने सन्मानपूर्वक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.