
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- मोर्शी तालुक्यातील निम्न चारगड प्रकल्पाअंतर्गत खोपडा गावातील नागरिकांची पुनर्वसन प्रकिया गतीने पूर्ण करावी.तेथील २९ कुटुंबांना पुनर्वसनाचा लाभ मिळाला नाही.उपविभागीय अधिकारी,तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी समन्वयाने त्यांच्या समस्या तात्काळ सोडवाव्या.त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी व त्याबाबचा अहवाल लगेच सादर करावा असे जलसंपदा व कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी निर्देश दिले.
निम्न चारगड प्रकल्पाअंतर्गत पुनवर्सन प्रक्रियेत नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याबाबत सिंचन भवन येथे बैठक घेण्यात आली त्यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संबंधितांना निर्देश दिले.बैठकीला जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता विवेक सोळंके,उपविभागीय अभियंता सत्येन पाटील,जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत,सुरेंद्र आडे,जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता मेघा अक्केवार,उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सुभाष दळवी,उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले,जलसंपदा प्रादेशिक विभागाचे अनिल बहादुरे आदी उपस्थित होते.
निम्न चारगड प्रकल्पाअंतर्गत ४९८ कुटुंबांना त्यांच्या भूखंडाचा ताबा देण्यात आला असून त्यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.अंजनगाव सुर्जी येथील शहानुर प्रकल्प अंतर्गत ७९ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना जीवन प्राधिकरण राबवित आहे.या योजनेअंतर्गत वाढीव गावे समाविष्ट करणे शक्य आहे किंवा कसे,याबाबतही आढावा घेण्यात आला.नव्याने योजना प्रस्तावित करण्याचे निर्देश राज्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले.