
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते.भारतातील हिंदू सुधारणा चळवळींमध्ये ते प्रमुख होते. त्यांनी ब्रिटिशशासित भारतात राष्ट्रवाद आणण्यात योगदान दिले. विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली.”माझ्या अमेरिकेच्या बहिणी आणि बंधूंनो…”, या शब्दांनी सुरू झालेल्या त्यांच्या भाषणासाठी ते फार प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये त्यांनी १८९३ मध्ये शिकागो येथील जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय दिला.
बालपण
उत्तर कोलकत्ता सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३, सोमवारी सकाळी ६:३2 वा. (पौष कृष्ण सप्तमी, संक्रांतीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील) अॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा अनमोल वाटा होता. नरेंद्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवतगीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड दाखवली.
त्याला शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्याने बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच तो व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोन यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद हे मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरू नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठियुद्ध, गायन आणि वादन इत्यादी छंद होते.
शिक्षण
नरेंद्रनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी १८७१ साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. १८८१ साली ते फाइन आर्टची आणि १८८४ मध्ये बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
नरेंद्रनाथांनीडेविड ह्युम, इम्यानुल कँट,[गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, हर्बट स्पेंसर,जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इत्यादी विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवादाने ते प्रभावित झाले होते. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सरच्या ‘एज्युकेशन’ या पुस्तकाचा अनुवादही केला होता. काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्कही स्थापन केला होता. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते.
१८८१-८४ मध्ये ते जेथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हेस्टी यांनी म्हटले आहे की, “नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पाहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही.” त्यांना ‘श्रुतिधारा’ (विलक्षण स्मरणशक्ती असलेला) म्हटले जात असे. “एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटले नव्हते.” असे महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटले होते.
गुरु रामकृष्ण यांची भेट
कोलकात्यात शिमला नामक मोह्ल्यात् सुरेंद्रनाथ मित्र यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपल्या घरी एका समारंभासाठी बोलविले होते. त्यावेळी कुणी चांगला गायक न मिळू शकल्याने त्यांना आपल्या शेजारी राहणा-या नरेन्द्रला बोलावून आणले. इ.स. १८८१ च्या नोव्हेंबर महिन्यात श्री रामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्रला भेटले आणि त्याचे गायन ऐकून संतुष्ट झाले. त्यांनी त्याला दक्षिणेश्वर येथे येण्याचे आमंत्रण दिले. सूक्ष्म योगदृष्टीच्या साहाय्याने श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथांचा महिमामय अति उज्ज्वल भावी काल पाहू शकले होते म्हणूनच ते नरेंद्राकडे आकृष्ट झाले, असे दिसते.
नरेंद्राची साधना
अनन्यचित्त होऊन गुरूने सांगितलेल्या मार्गाने साधना करीत नरेंद्र उन्नती साधत होता. रामकृष्णांच्या पवित्र सहवासात नरेंद्रात आमूलाग्र बदल झाले. त्यांच्यासह असलेल्या अन्य तरुण साधकांनी रामकृष्णांच्या आदर्शांना स्वीकारून काशीपूरच्या उद्यानात तपश्चर्या केली. रामकृष्णांच्या सेवेत हे सर्व तरूण सतत राहिल्याने त्या सर्वांच्यात अपूर्व आध्यात्मिक प्रेमसंबंध जोपासले गेले. येथे या ठिकाणीच भावी ‘रामकृष्ण संघाची’ पायाभरणी झाली.
गुरुभेट व संन्यासदीक्षा
याच ठिकाणी एका शुभ दिवशी रामकृष्ण यांनी आपल्या यास सर्व शिष्यांना भगवी वस्त्रे देऊन संन्यासदीक्षा दिली. संन्यासग्रहणानंतर गतकालीन युगप्रवर्तक संन्यासी मंडळींचे जीवन आणि उपदेश यांचे अनुशीलन करणे हेच नरेंद्राचे लक्ष्य बनले. नरेंद्राच्या घरी लहानाचे मोठे झालेले त्यांचे नातेवाईक डॉ. रामचंद्र दत्त हे रामकृष्णांचे भक्त होते. धर्मभावनेने प्रेरित होऊन नरेंद्राच्या मनात लहानपणीच तीव्र वैराग्य उत्पन्न झालेले पाहून डॉ. दत्त एकदा त्यांना म्हणाले, “भाई, धर्मलाभ हेच जर तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट असेल, तर तू ब्राह्मोसमाज वगैरेंच्या भानगडीत पडू नकोस. तू दक्षिणेश्वरीला श्रीरामकृष्णांकडे जा.”
एके दिवशी त्यांचे शेजारी सुरेंद्रनाथ यांच्याकडेच रामकृष्ण परमहंसांचे त्यांना दर्शन झाले. सुरुवातीचे काही दिवस रामकृष्ण नरेंद्रनाथांना आपल्यापासून क्षणभरही दूर ठेवू इच्छित नसत. त्यांना जवळ बसवून अनेक उपदेश करत. ते दोघेच असतांना त्यांची आपापसांत खूप चर्चा होत असे. रामकृष्ण त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भार नरेंद्रनाथांवर सोपवणार होते. एके दिवशी रामकृष्णांनी एका कागदाच्या कपट्यावर लिहिले, `नरेंद्र लोकशिक्षणाचे कार्य करील.’ काहीसे आढेवेढे घेत नरेंद्रनाथ त्यांना म्हणाले, “हे सारे माझ्याने होणार नाही.” रामकृष्ण त्यांना लगेच दृढपणे म्हणाले, होणार नाही? अरे तुझी हाडं हे काम करतील.” पुढे रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरण `स्वामी विवेकानंद’ असे केले.
धर्मप्रसाराच्या कार्याला सुरुवात
रामकृष्ण मठाची स्थापना श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले एक गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात एक पडक्या इमारतीत मठाची स्थापना केली. तत्पूर्वी त्या जागेत भुतांचा वावर आहे, असा लोकप्रवाद होता. विवेकानंदांनी रामकृष्णांनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भस्मास्थींचा कलश त्या ठिकाणी नेऊन ठेवला आणि त्यांचे भक्त तेथे राहू लागले.
विवेकानंद’ नामकरण
राजा अजितसिंग खेत्री यांनी १० मे १८९३ रोजी स्वामीजींना ‘विवेकानंद’ असे नाव दिले.
कन्याकुमारी
रामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले. अखेरीस ते कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले. तेव्हा त्यांनी समुद्रात उडी मारली आणि शिलाखंडावर जाऊन ध्यानात बसले. त्यावेळी भारतातील दैन्य पाहून त्यांचे कासावीस झालेले मन अधिकच हळवे झाले. भारताच्या कल्याणासाठी, येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामीजींनी केला. अद्वैत वेदान्त विचार जगभरात पोचविणे आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे यासाठी त्यांनी भारताच्या सीमा ओलांडून पाश्चिमात्य जगात जाण्याचेही ठरविले.
शिकागोतील सर्वधर्मपरिषद
सप्टेंबर ११, १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो – आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले. तेथे त्यांनी “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो” अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे सात हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो दोन मिनिटे अखंड चालू होता. “जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो” या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले.
ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन ‘भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी’ असे केले.
‘न्यूयॉर्क क्रिटिक’ने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की “ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीरगंभीर उद्गार देखील त्यांच्या काषाय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत.” वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली
समाधी
शुक्रवार, जुलै ४, १९०२ ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला. आणि स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूंसमवेत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि चाळीस वर्षापर्यंत जगणार नाही ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली. कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक विवेकानंद केंद्र या संस्थेच्या पुढाकाराने उभे राहिले आहे आहे.