दैनिक चालु वार्ता
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी :- प्रतिदिनी सकाळी ९:१५ वाजता राष्ट्रगीत वाजवून दिवसाची सुरुवात केली जाणे बाबतचा आटपाडी तालुक्यातील सर्व गावांनी राष्ट्रगीताचा भिलवडी पॅटर्न राबवावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांनी केले आहे. आपल्याच जिल्ह्यातील भिलवडी गावाने प्रतिदिनी विशिष्ट वेळेत राष्ट्रगीत वाजविणेचा नवा आदर्श काही महिन्यांपासून सुरु केला आहे. या अतिशय स्तुत्य उपक्रमासाठी व्यापारी बांधवांची ही संकल्पना तेथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी उचलुन धरली आहे आणि नित्यनियमाने विशिष्ट वेळेत राष्ट्रगीत वाजवून सर्वांसाठीचा हा आदर्श कृतीतून दाखविला जात आहे.
दररोज राष्ट्रगीत वाजविल्याने, १५ ऑगस्टचा स्वातंत्रदिन आणि २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन, प्रतिदिनी असल्याचीच अनुभूती येवू शकते . तसे वातावरण निर्माण होणार असल्याने प्रत्येक नागरीकांच्या राष्ट्रभक्तीला अधिकाधिक बळकटी येणार आहे. औंध संस्थानचा महाल असलेल्या आटपाडी तालुक्याने स्वातंत्र्यपूर्व काळात, स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका बजावल्याचा मोठा इतिहास आहे . अनेक स्वातंत्र्य सेनानींना त्यांच्या भूमिगत अवस्थेत आटपाडीत आश्रय देऊन त्यांच्या चळवळीला सहाय्य करण्याचे काम अनेक आटपाडीकरांनी केले आहे . देशाला स्वातंत्र मिळण्या आधीच आपल्या संस्थानात लोकशाही राज्य व्यवस्था निर्माण करण्यात येथील संस्थानिक यशस्वी झाले होते . देशप्रेम ओतप्रोत भरलेल्या अनेक पिढ्या या भागाने दिल्या आहेत .
सीमेवर लढणारे सैनिक, अधिकारी, मातब्बर साहित्यीक, लेखक, कवी, कथाकार कलाकार, नकलाकार बहुरूपी, राजकारणी, पत्रकार, खेळाडू, प्रत्येक क्षेत्रात आदर्श ठरणारी युवा पीढी, ज्येष्ट मान्यवर बंधू भगिनी हे भागाचे मोठे वैशिष्टय आहे . स्वातंत्रपूर्व काळात तालुक्यातील अनेक गावातून भल्या पहाटे स्वातंत्र्याचा जयजयकार करणाऱ्या प्रभात फेऱ्या निघत असत . सेवादलाच्या माध्यमातून देशभक्तीपर अनेक उपक्रम राबविले जात असत . शालेय विद्यार्थ्यापासून गावातील सर्व स्तरातील गावकरी, माता, भगिनी या प्रभात फेऱ्या मध्ये सहभागी होत . या ज्वलंत इतिहासाला अनुसरूनच प्रतिदिनी सकाळी राष्ट्रगीत वाजवून देशप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवावी . याच निखळ भावनेतून राष्ट्रगीत वाजविण्याच्या संबधीचे हे आवाहन मी आटपाडी तालुक्यातील ६० गावच्या सर्व ५६ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना करीत आहे .
प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीच्या इमारतीवर अथवा मध्यवर्ती मोक्याच्या वर्दळीच्या ठिकाणी उंचावर लाऊड स्पीकर लावून राष्ट्रगीत वाजविल्याने गावात प्रतिदिनी राष्ट्रप्रेम जागृत होणार आहेच तथापि सर्वत्र उत्साह संचारणार आहे . विशिष्ट वेळेत वाजणार्या राष्ट्रगीताने रस्त्यावरून जाणारे – येणारे, परिसरात वावरणारे, शेतात, व्यवसायात राबणारे, आवाज जाईल तेथ पर्यतचे गावकरी बंधु, भगिनी, विद्यार्थी वगैरे सर्वजण हातातील सर्व कामे टाकून राष्ट्रगीत वाजताना उभे राहतील . राष्ट्रगीत वाजतानाची आचारसंहिता सर्वांनाच माहीत असल्याने आणि राष्ट्रगीत वाजविण्याने ही आचारसंहिता प्रत्येकाच्या नित्याचाच भाग बनेल . तरी कृपया ग्रामपंचायतींच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या सुचनेचा स्वीकार करून आप आपल्या गावात राष्ट्रगीत प्रतिदिनी वाजवण्याचा स्तुत्य उपक्रम सुरु करावा . असे आवाहन ही सादिक खाटीक यांना प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सर्व गावच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना केले आहे .