
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- जे नागरिक लस घेणार नाहीत, त्या कुटुंबाला फेब्रुवारी महिन्याचे रेशन न देण्याचा निर्णय सोमवारी टास्क फोर्सच्या बैठकीत झाला. घाटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांनी लस घेतलेली असेल तरच उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लस घेतलेली नसेल तर जागेवरच लसीकरण करून उपचाराचा मार्गही मोकळा करुन दिला जाईल.
घाटी रुग्णालयातील आतररुग्ण विभागात दाखल होणाऱ्या रुग्णांनाही लसीची विचारणा करण्यात येईल. लसीचा किमान एक डोस बंधनकारक आहे.अपघात विभागात येणाऱ्या गंभीर रुग्णांसाठी मात्र लसीची सक्ती करण्यात येणार नाही. तसेच लस घेतलेल्या नातेवाईकांनाच रुग्णांना भेटण्याची परवानगी असेल. औरंगाबाद जिल्ह्यात ज्या भागात लसीकरण कमी आहे, त्या भागातील डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
व्हॅक्सिनेशन ऑन व्हील अंतर्गत ज्या भागात लसीकरण कमी आहे, त्या भागात हे वाहन नेण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या कमी होत असून, एकूण रुग्णांपैकी जे रुग्ण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर होते, अशा रुग्णांची केस स्टडी करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिले आहेत.