
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई : कोरोना आल्यानंतर 5-6 महिन्यांनंतर माझ्याकडे लोकांनी येऊन काही अधिकाऱ्यांचे कौतुक केलं आणि त्यांचा गौरव करण्यास सांगितलं.राजभवन केवळ राजकीय वस्तू नाही तर लोकांसाठी असावं. विशेष करून कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला. माझ्या आईने मला खूप करुणा दिली त्यामुळे मला कोरोनाची भीती नाही. जवळ जवळ 5000 लोकांचा मी गौरव केला, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
काल राजभवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दरबार हॉलचं उद्घाटन झालं . यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमात राष्ट्रपतींसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. राज्यपालांनी म्हटलं की, हे फक्त राजभवन नाही तर जनतेचं भवन बनलं पाहिजे अशी माझी भूमिका राहिली आहे. कोविड काळात अनेक लोक माझ्याकडे येत होते. अनेक लोक येत होते आणि काही लोकांचे सत्कार करण्याची मागणी केली होती.
काही लोक बोलले की तुम्हाला कोरोना होईल, पण मी सांगितलं की मला खूप करुणा मिळाली आहे. यावेळी राज्यपाल म्हणाले की, मलबार हिल, तिन्ही बाजूंनी समुद्र आहे. अनेक वर्षांपासून बाणगंगा देखील वास करते आहे. सिद्धिविनायक आणि मुंबा देवीची यावर कृपा आहे. राजभवनातील नव्या दरबार हॉलचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज सकाळी झाले. दरबार हॉलचे उद्घाटन 8 डिसेंबर रोजीच राष्ट्रपतींच्या हस्ते निश्चित झाले होते. परंतु तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या आकस्मिक निधनामुळे उदघाटन सोहळा त्यावेळी स्थगित करण्यात आला होता.
राजभवनातील नवीन दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच बांधण्यात आला असून त्याची आसन क्षमता 750 इतकी आहे. जुन्या हॉलची आसन क्षमता 225 इतकी होती. जुन्या हॉलची हेरिटेज वैशिष्ट्ये कायम ठेवताना नव्या सभागृहाला बाल्कनी तसेच समुद्र दर्शन घडविणारी गॅलरी अतिरिक्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजभवनातील दरबार हॉल शपथविधी सोहळे, शासकीय कार्यक्रम, पोलीस पदकदान समारोह, शिष्टमंडळाच्या भेटी तसेच लहान मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरला जायचा. इंग्लंडचे राजे पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या 1911 साली झालेल्या भारत भेटीच्या वेळी दरबार हॉल बांधण्यात आला होता. त्याची वास्तू रचना तत्कालीन वास्तु रचनाकार जॉर्ज विटेट यांची होती.
शंभर वर्षांहून अधिक काळ लाटा व वादळ-वाऱ्यांचे तडाखे सहन केल्यामुळे पूर्वीचा दरबार हॉल अतिशय जीर्ण झाला होता. त्यामुळे 2016 नंतर त्याचा वापर थांबविण्यात व कालांतराने त्याजागी नवा अधिक क्षमतेचा दरबार हॉल बांधण्याचा निर्णय झाला. नव्या दरबार हॉलचे बांधकाम 2019 साली सुरु झाले. मात्र कोविडच्या उद्रेकामुळे बांधकामाची गती मंदावली कालांतराने बांधकाम पुनश्च सुरु झाले व डिसेंबर 2021 मध्ये हॉल बांधून पूर्ण झाला.