दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- हॉटेल व्यासायिकाच्या हत्येप्रकरणी कुख्यात गुंड राजेंद्र निकालजे उर्फ छोटा राजनची मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष सुटका केली. ३० ऑक्टोबर १९९९ रोजी दहिसर रावलपाडा जंक्शनजवळ हॉटेल व्यवसायिक नारायण वेंकट पुजारीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यात राजनचा समावेश असल्याचा दावा तपास यंत्रणेकडून करण्यात आला. त्यावर विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. मात्र, राजन विरोधात ठोस पुरावा आणि आरोप सिद्ध करण्यास तपासयंत्रणा अपयशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने छोटा राजनची निर्दोष सुटका केली.
२५ नोव्हेंबर २०१५ ला इंडोनेशियातील बालीत छोटा राजनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर २७ वर्ष भारतीय तपासयंत्रणेला गुंगारा देणाऱ्या राजनला ६ नोव्हेंबर २०१५ ला भारतात आणले होते. भारतात आणल्यापासून राजन विरोधातील सर्व खटले हे सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहेत. तसेच राजन हा फरार होऊन बनावट नाव आणि पासपोर्टवर अनेक वर्ष चकवा देत होता. खरी ओळख पटल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तेव्हापासून राजन विरोधात विविध न्यायालयात खंडणी, हत्या यांसारखे अनेक प्रलंबित खटल्यावर सूनवणी सुरू आहे. काही खटल्यात त्याला दोषी तर काहींमध्ये मुक्त करण्यात आले आहे.