
दैनिक चालु वार्ता
अक्कलकुवा प्रतिनिधी
आपसिंग पाडवी
अक्कलकुवा :- ‘स्वच्छ भारत…स्वच्छ शहर’चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्यात येऊन शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. मात्र, अक्कलकुवा शहराची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे कोरोनाची धास्ती अन शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात कोरोनाच्या फैलावाला रोखता रोखता दुसऱ्याच आजाराने तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधूनच उपस्थित केल्या जात आहे.
स्वच्छतेवर किती खर्च होतो? मात्र, अक्कलकुवा शहरात निधी तर मिळतो; मात्र तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो हे शहरातील अस्वच्छतेवरून स्पष्ट होते. शहरातील अनेक भागातील नाल्या या घाणीने तुडूंब भरलेल्या असून ते घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. तर काही ठिकाणी कचरा हा अस्ताव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण देण्याचं काम करीत आहे. शहर स्वच्छतेवर भर असल्याची ओरड स्थानिक प्रशासनाकडून केली जात असली तरी शहरात अनेक ठिकाणी असलेली घाण व कचरा हे स्वच्छतेबाबत किती जागृत आहे हे दाखवून देते.
देशपातळीपासून ते गावपातळीपर्यंत स्वच्छतेकरिता प्रत्येक गावाकरिता लाखो, करोडो रुपयांचा निधी वितरीत केल्या जातो. अन तो निधी नागरिकांच्या सवच्छतेच्या दृष्टीने केला जातो. मात्र, त्या निधीची विल्हेवाट स्वच्छतेच्याच दृष्टीने करणे हे काम स्थानिक प्रशासनाचे असते व त्या निधीतून शहर स्वच्छतेवर भर देणे हे कामही तेवढेच महत्त्वाचे असते. याकडे ग्रामपंचायत प्रशासन मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार इथल्या गावकऱ्यांनी केली आहे. अक्कलकुवा ग्रामपंचायत असलेल्या या गावामध्ये मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. ह्या सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत आहे.
गावांमध्ये बहुतांश रस्त्यांचे बांधकाम झालेले नसल्याने गटारं देखील बांधण्यात आलेली नाहीत. त्यामुळे गावातील संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर सोडले जात आहे. तर काही नागरिकांनी सांडपाण्यासाठी असलेले शोषखड्डे देखील बुजवून घेतल्याने हे संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर तुंबल्याने सर्वदूर गटारे साचली आहेत, असा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे. या साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. सोबतच दुर्गंधीमुळे देखील नागरिक बेजार झाले आहेत.
आधीच कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे, तर आता जिल्ह्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव होत असल्याने या घाणीचे साम्राज्या परसल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.त्यामुळे अक्कलकुवा शहरातील शीख गल्लीच्या रस्त्यावर तात्काळ साफसफाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.रुपसिंग वसावे यांनी केली आहे