
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
आयुर्वेद हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह जीवन + विद्या (वेद) अशाप्रकारे होतो. आयुर्वेदाची सुरवात ब्रह्मापासून झाली असे मानले जाते. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो.
आयुर्वेदातील सिद्धान्त आणि औषधे आधुनिक विज्ञानाच्या clinical trials या पद्धतीनुसार तपासलेली नसतात. त्यामुळे आयुर्वेदाची विश्वसनीयता वाढवण्यासाठी या प्रत्यक्ष वैद्यकीय चाचण्यांची मोठ्या प्रमाणात गरज आहे असे काही लोकांचे मत आहे.आयुर्वेदिक औषधांचा विशेषतः मुलांना उपयोग होतो. आर्युवेदानुसार एका वर्षाची वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर अशा सहा ऋतुंमध्य विभागणी केलेली आहे. त्या त्या ऋतुंमधील होणा-या वातावरणातील वदलांप्रमाणे आपला आहारविहार कसा असावा याचे फार उत्तम वर्णन आयुर्वेदामध्ये केलेले आहे. यालाच ऋतुचर्या असे म्हणतात.
आयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेद या इसवी सनपूर्व सुमारे १२०० मध्ये रचल्या गेलेल्या वेदामधून घेतले आहेत. अथर्ववेदात आयुर्वेद शास्त्राचे अधिक वर्णन आहे. म्हणून आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद मानतात आणि त्यामुळे आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. तथापि, विशेषतः गौतम बुद्धाच्या आणि त्यानंतरच्या काळात, आयुर्वेदामध्ये अनेक मोलाच्या गोष्टींची भर घालण्यात आली. समुद्रमंथनातून निघालेले भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदातील परंपरेनुसार आद्य वैद्य मानले जातात.
आयुर्वेद हे प्राचीनतम शास्त्र असूनही आजच्या युगातही या शास्त्राच्या सिद्धान्तांवर आधारित चिकित्सा उपयुक्त व यशस्वी ठरते. आयुर्वेदात मूलतः दैवी आणि मानुषी अशा दोन तत्त्वपरंपराआहेत. मानुषी परंपरेत चरक संहिता, सुश्रुत संहिता, काश्यप संहिता ह्या तीन संहितांमध्ये तीन वेगवेगळ्या परंपरा वर्णन केलेल्या आहेत. त्यापैकी महर्षि चरक आणि महर्षि सुश्रुत यांनी प्रत्येकी एका परंपरेची स्थापना केली आणि त्यानंतर अनेक वर्षे त्यांच्या शिष्यगणांनी हे ज्ञान आत्मसात करून वाढविले. चरक संहिता आणि सुश्रुत संहिता हे दोन ग्रंथ याच परंपरांचा सारांश आहे आणि म्हणून हे ग्रंथ कोणी एका लेखकाने लिहिलेले नाहीत. तिसरी परंपरा कश्यपांची आहे.
आयुर्वेदातील या विविध परंपरांनी सुमारे बाराशे वर्षांचा काळ व्यापलेला आहे. गौतम बुद्धाच्या काळापासून (सुमारे इसवी सनपूर्व ५५६) ते सम्राट हर्षवर्धनाच्या काळापर्यंत (सुमारे इ.स. ६००) या परंपरांचे कार्य चालत होते. पण तीन शाखांचे औपचारिक सिद्धान्त आणि युक्त्या मूळ बौद्ध साहित्यात दिसून येतात. चरक आणि सुश्रुत संहितांचे बऱ्याच लोकांनी संपादन केले आहे. अनेक शतकांनंतर त्यांच्यामध्ये अगणित आवर्तने झाली आहेत. आयुर्वेदामध्ये शल्यचिकित्सेचीही जी परंपरा आहे तिची सुरूवात सुश्रुताने केली असे मानतात.
इसवी सनाच्या सातव्या शतकात सिंध प्रांतात राहणाऱ्या वाग्भट यांनी सुरूवातीच्या आयुर्वेदिक साहित्यांचे एकत्रीकरण केले. त्याला अष्टांग हृदय असे म्हणतात. चरक, सुश्रुत आणि वाग्भट यांचे काम आयुर्वेदाचा मूळ आधार समजले जाते म्हणून या तिघांना आदराने बृहद त्रयी या नावांनी ओळखले जाते. त्यानंतर आठव्या शतकात वैद्य माधव ऋषि यांनी निदान ग्रंथ हा ग्रंथ लिहिला जो थोड्याच काळात प्रमाण बनला. यातील ७९ प्रकरणांमध्ये विविध विकार, त्यांची लक्षणे, कारणे आणि क्लिष्टता याबद्दल चर्चा केली आहे. यानंतर भावप्रकाश व योगरत्नाकर हेही ग्रंथ निर्माण झाले.
नवीन भर पडल्याने हे तीन ग्रंथ आजही प्रमाण मानले जातात. यांना लघु त्रयी म्हणून ओळखले जाते. विविध औषध निर्मितीच्या प्रक्रिया विषद करणारा शारंगधर हाही एक प्रमुख वैद्य. बृहद् त्रयी, लघु त्रयी व शारंगधर या तिन्हीत आयुर्वेद सामावला आहे. आयुर्वेदात मुख्यतः वनस्पती व त्यांचे वेगवेगळे भाग, कंदमुळे यांच्यापासून तयार झालेली औषधे वापरतात. पहिल्या सहस्रकानंतर रासायनिक औषधेही थोड्या प्रमाणात वापरली जाऊ लागली. इ.स.च्या आठव्या शतकात उग्रादित्य आणि इ.स.च्या चौदाव्या शतकात सरनगध्र यांनी बऱ्याच रासायनिक औषधांचा अभ्यास केला.
विंचू, साप, कोळी इ. प्राण्यांच्या विषांचाही प्राणिज औषध म्हणून वापर केला जातो. विषौषधाचा अभ्यास करणारी अगदतंत्र ही आयुर्वेदाची एक शाखा आहे. आयुर्वेदांच्या प्राचीन ग्रंथांत केवळ आहाराचाच विचार केला नाही तर विविध ऋतूंमध्ये, कालानुरूप, हवापाण्यात बदल होत असताना आपण कसे राहावे, कसे राहू नये, याचा साधकबाधक विचार केलेला आहे. तर या ग्रंथ आणि पोथ्यांमध्ये अगदी सर्वसामान्य विकारांपासून दुर्मीळ विकारांवर मात्रा आहेत. आयुर्वेदाच्या दुर्मीळ पोथ्यांचे संग्रहण अनेकांनी केले आहे, नाशिकचे दिनेश वैद्य हे त्यांपैकी एक आहेत.
दोष :-
सर्व शारीरिक प्रक्रिया तीन दोषांच्या संतुलनातून नियंत्रित केल्या जातात, असे आयुर्वेद मानते.
वात दोष :-
वात हा शरीर आणि मनाची हालचाल नियंत्रित करतो. जास्त वातामुळे काळजी, निद्रानाश, बद्धकोष्ठता, इत्यादी त्रास होतात. वात रक्त पुरवठा, श्वासोच्छ्वास, मनातील विचार इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. वातामुळे मज्जासंस्था, श्रवण, वाणी कार्यान्वित होतात. वातामुळे उत्साह आणि सर्जनक्षमता वाढतात. वाताचा पित्त आणि कफ यांच्यावरही परिणाम होतो. बऱ्याचवेळा वातदोष हे रोगाचे पहिले कारण असते. वाताला वायू असेही म्हणतात.
कफ दोष :-
कफ आपतत्त्वापासून बनतो असे मानले जाते. कफामुळे शरीरातील मूलद्रव्यांना मूर्त स्वरूप मिळते, प्रतिकारशक्ती वाढते. कफ सांध्यामधील स्नेहक, जखम भरणे, ताकद, संतुलन, स्मरणशक्ती, हृदय व फुप्फुसे यांना नियंत्रित करतो. कफामुळे आपुलकी, प्रेम, शांतता हाव, मत्सर हे गुण मिळतात. अतिकफामुळे स्थूलता, सुस्ती आणि प्रत्यूर्जता ((ॲलर्जी) इत्यादी त्रास होतात.
पित्त दोष :-
पित्ताची निर्मिती आप आणि अग्नि या तत्त्वांपासून होते असे मानले जाते. पित्त शरीरातील उष्णता, चयापचय, मन आणि शरीर यांचे रूपांतरण, अन्नपचन, संवेदना, सदसदविवेकबुद्धी इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवते. अति पित्तामुळे राग, आलोचना, व्रण, पुरळ, इत्यादी त्रास होतात. संतुलित पित्ताने नेतृत्व गुण विकसित होतात.