दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
मुंबई ः राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अखेर १० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या पॅकेजची घोषणा केली.
राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी व त्यामुळे आलेल्या पुराने ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले होते. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता राज्य सरकारने १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानूसार जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर. बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर तर बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर अशी ही मदत असणार आहे. ही मदत २ हेक्टर क्षेत्रापर्यंत मर्यादेत करण्यात येणार आहे.
राज्यातील विशेषत: विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती, पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. पंचनामे आणि आढावा घेतल्यानंतर आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत मदतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानूसार सरकारने पॅकेजची घोषणा केली.