
दैनिक चालु वार्ता, वृतसेवा
नवी दिल्ली :- पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये निवडणूक सभेला संबोधित केले. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या उर्वरित निवडणूक टप्प्यांसाठी प्रचार सुरू आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपसाठी सातत्याने सभा घेत आहेत.
ज्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. तसेच उत्तर प्रदेश निवडणुकीदरम्यान पंतप्रधानांनी नाव न घेता युक्रेन-रशिया तणावावरही भाष्य केलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ”सध्या जगात मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरू आहे. भारताने आपल्या देशासाठी आणि संपूर्ण मानवजातीसाठी खंबीर असणे अत्यंत आवश्यक आहे. आज तुमचे प्रत्येक मत भारताला मजबूत करेल.”
पंतप्रधान मोदी यांनी देशाला मजबूत बनवण्याची भाषा करतानाच युक्रेन-रशिया तणावावर नाव न घेता भाष्य केलं आहे, असं म्हणता येईल. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ”आज उत्तर प्रदेश ज्या विकासाच्या वाटेवर चालले आहे, त्यात डबल इंजिनच्या सरकारची महत्वपूर्ण भूमिका आहे. 2014 ते 2017 या काळात मी या घराणेशाही असलेल्या पक्षाचे कारनामे अगदी जवळून पाहिले आहेत. या घराणेशाही सरकारने स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष केलं. यांच्या राजकारणामुळे 2017 पूर्वी बस्ती, बलरामपूर आणि बहराइचच्या लोकांनाही भेदभावाचा सामना करावा लागला आहे.”
मोदी म्हणाले की, ”आमची सरकार संकटाच्या वेळी कोणाचीही साथ सोडत नाही. गरीब कुटुंबाला आधार म्हणून आमची सरकार उभी राहते. सरकारची गरिबांसाठी असलेली ही संवेदनशीलता या कोरोनाच्या काळातही दिसली आणि लोकांना ती जाणवली. या संकटाच्या वेळी भारतातील कोणताही नागरिक, मग तो श्रीमंत असो वा गरीब, शहरात राहणारा असो वा खेड्यात, मग तो स्त्री असो की पुरुष, कोणीही या लसीपासून वंचित राहू नये यावर आमच्या सरकारने भर दिला आहे.”