
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- थोर संत कर्मयोगी गाडगेबाबा यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालय येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, अधिक्षक उमेश खोडके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर,नाझर किशोर चेडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
संत गाडगे महाराजविषयी माहिती
गाडगे महाराज हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान,अंधश्रद्धा,अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते.”तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |” असे सांगत दीन,दुबळे,अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या,अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा,अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली.रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव.या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत.डोक्यावर झिंज्या,त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच,एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
संत गाडगे बाबांचे बालपण
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी,मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती.लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता.विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडील झिंगराजी हे परीट होते.आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते.
डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडील दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले.त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे,नांगर चालविणे,शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत.त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता.डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते.त्यांना चार मुली होत्या.पण ते संसारात फारसे रमले नाहीत.घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.
सामाजिक सुधारणा
१८९२ साली त्यांचे लग्न झाले.त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते.हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता.गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला.दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला.
त्यांनी तीर्थाटन केले,अनेक ठिकाणी भ्रमण केले.वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही.कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे,मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा ख्यात्या असायचा.ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे.अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे.त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले.ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत.
सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा,भोळ्या समजुती,अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला.आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची,दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे,सोपे असत.चोरी करू नका,सावकाराकडून कर्ज काढू नका,व्यसनांच्या आहारी जाऊ नका,देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका,जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत.
देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत.आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत.गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत,आपले तत्त्वज्ञान पटवून देत.
त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या,गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली,अनेक नद्यांकाठी घाट बांधले,अतिशय गरीब,अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली,कुष्ठरोग्यांची सेवा केली.महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे – ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ – असे म्हटले जाते.