दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
‘या’कारवाईत ४ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि ६ नेते, पदाधिकारी शिवसेनेचे दिसून येतात.
त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष जात्यात अडकले आहेत. काँग्रेस मात्र सुपात आहेत असेच म्हणावे लागेल.
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नबाव मलिक यांना ईडीने अटक केली आहे. तब्बल ७ तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. आज सकाळी ५ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर ७ वाजता मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र चौकशीसाठी जाताना मलिक हे स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. ईडीमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड आणि मलिक यांचे जमीनीबाबतचे थेट आणि कमी पैशात व्यवहार झाले होते. याच बाबतचे पुरावे अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सापडले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
मलिक यांच्या अटकेनंतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कचाट्यात अडकलेले ते दहावे नेते ठरले आहेत. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री एकनाथ खडसे, मंत्री अनिल परब, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, खासदार भावना गवळी, माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडी, सीबीआय, आयकर अशा वेगवेगळ्या केंद्रीय तपास यंत्रणांनी वेळोवेळी वेगवेगळी कारवाई केली आहे. याशिवाय आता ठाकरे कुटुंबियांवर देखील सोमय्या यांनी आरोप केले आहेत.