
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- भारताने युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धात कोणतीही बाजू घेतली नाही. परंतु, तरी मानवतावादी आधारावर हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 6 विमानांद्वारे 1,400 लोकांना भारतात आणण्यात आले आहे. युक्रेन-भारत हल्ल्यात कर्नाटकमधील विद्यार्थी नवीन शेखरप्पा याचा मृत्यू झाला. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
”आज विकास सोडून सर्व प्रकारचं केवळ राजकारण होत असल्याचं दिसतं आणि याचा फटका सर्वसामान्य माणसाला सहन करावा लागतोय. त्यामुळं देशात सर्व राज्यांना विश्वासात घेऊन विकासाचा अजेंडा तयार करणं आणि कोणत्याही राज्याबाबत भेदभाव न करता तो राबवणं अधिक गरजेचं आहे, असे रोहित पवार यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीत आपल्याला रशियाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. जेव्हा एखादा देश एकाच व्यक्तीच्या विचाराने चालतो तेव्हा त्याचे गंभीर दुष्परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतात आणि आपणच बरोबर आहोत असं त्या नेत्याला वाटतं तेव्हा त्याला थांबवणंही अवघड असतं.
रशियाबाबत बोलायचं तर केवळ एका व्यक्तीच्या इगोमुळं संपूर्ण जगाला प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.. आणि इगोने भरलेल्या अशा व्यक्तीने एखादा खेळ सुरू केला आणि त्यात त्याचा पराभव होत असला तरीही माघार न घेण्याची त्याची प्रवृत्ती असते. यामुळं संपूर्ण जग आज वेठीस धरलं गेलंय.
लोकशाही टिकवणं हे लोकांच्याच हाती असतं आणि लोकशाही चिरडण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर लोकांनीच पुढं येऊन ती वाचवण्याची गरज आहे.
भारताबाबत विचार करताना आपल्याला संरक्षणावर खर्च करावाच लागेल पण आज महागाई आणि बेरोजगारीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलं असताना मोठ्या प्रमाणात संरक्षणावर खर्च वळवणं आपल्यासारख्या देशाला परवडणार नाही. अन्यथा देशात अनेक अडचणी वाढू शकतात.