दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रजनीश शेठ यांची नियुक्ती झाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांना आणण्यात आले आहे. यानंतर दोनच आठवड्यांत पांडे यांना सीबीआय चौकशीला सामोरे जावे लागले आहे. पांडे यांची आज सीबीआयने तब्बल सहा तास चौकशी केली आहे. यामुळे पांडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्यावर दबाव आणल्याचा पांडे यांच्यावर आरोप आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील तक्रार मागे घ्यावी, यासाठी पांडेंनी दबाव आणल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी आज पांडे यांची चौकशी करण्यात आली. ही चौकशी तब्बल सहा तास सुरू होती. विशेष म्हणजे, पांडे यांची मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर दोनच आठवड्यांत ते केंद्रीय अन्वेषण विभागाच्या रडारवर आले आहेत. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करण्यात आला आहे. याची चौकशी सीबीआयकडून सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून तत्कालीन पोलीस महासंचालक पांडे व तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना समन्स बजावण्यात आले होते. या प्रकरणी कुंटे यांचा जबाब सीबीआयने नोंदवला आहे. या प्रकरणात ईडीकडूनही चौकशी सुरू आहे.
सीबीआयने या प्रकरणाच्या चौकशी करताना अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्या तपासाचा एक भाग म्हणून सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांना समन्स बजावण्यात आले होते.
संजय पांडे यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. तेथे मागील महिन्यात रजनीश शेठ यांना नेमण्यात आले. पांडे यांच्या नावाला लोकसेवा आयोगाकडून हिरवा कंदिल न मिळाल्याने त्यांना पोलीस महासंचालकपदी कायम नेमता आले नाही. नंतर मुंबईसारखे महत्वाचे पद देऊन महाविकास आघाडी सरकारने त्यांच्यावरील लोभ कायम ठेवला.
संजय पांडे यांनी आपल्या महासंचालकपदाच्या हंगामी काळात पोलिस कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले होते. त्यामुळे त्यांच्याविषयी कर्मचाऱ्यांत आपुलकीची भावना होती. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आगामी काळात होत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या मनातील पोलिस आयुक्त मुंबईत आल्याची चर्चा खात्यात रंगली होती.