दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- शिशिराची थंडी ओसरायला लागली पानगळीचे उघडी पडलेले वृक्षराजी नव्या पालवीचे लेणे अंगावर मिरवायला लागली की वसंताची चाहूल लागते या वसंतात फक्त रंगाची उधळण रंगोत्सव सुरू होतो. निसर्गाचा शिशिरात बोडक्या झालेल्या शेताला केशरी लाल रंगात नाहू घालणारा पळस नटलेला चोहीकडे पाहण्यास मिळत आहे. कंधार तालुक्यातील फुलवळ, गऊळ, अंबुलगा, दिग्रस, गुंटूर प्रवास करणाऱ्या वाटसरूंना ओसाड माळरानावर अगदी दिमाखात आशा बहुगुनी त्यांच्याकडे लक्ष जाताच पाहणाऱ्याच्या डोळ्यांना भुरळ घालणारा पळसाच्या वृक्षावर गडद लाल, नारंगी, तांबड्या गडद लाल केशरी रंगाची ओसाड माळरानावर चादर पसरली असे वाटत आहे.
साधारणतः दहा ते पंधरा वर्षांपूर्वी पळस वृक्षाच्या पत्रवाळी करिता तालुक्यातच नाहीतर जिल्ह्यामध्ये गऊळ हे गाव प्रसिद्ध होते. त्यावेळी अन्यसाधारण महत्त्व होते. कार्यक्रम, समारंभ, लग्नसराई, देवाचे भंडारे यासाठी पळसाच्या पानांची पत्रवाळी, दुरणे यासाठी मोठी मागणी असायची आणि याचा वापरही मोठया प्रमाणात होत होता. या दिवसांमध्ये गऊळ, हरबळ, दिग्रस, गुंटूर या गावातील कामगारांना काम मिळायचे. या कामावरच त्यांचा संसाराचा गाडा चालत असायचा. पण आता याची जागा प्लास्टिक आणि थर्माकोल च्या कृत्रिम पत्रवाळीने घेतली आहे. आता पळसाच्या पानांची पत्रवाळी, दुरने जवळपास माणसाच्या वापरण्यातूनच निघून गेली.
याबरोबरच आयुर्वेदिक दृष्ट्या बहुगुणी असणाऱ्या पळसाच्या फुलांना पाण्यात भिजत ठेवून त्यापासून होळी, धुलीवंदन, रंगपंचमी रंग तयार केला जायचा. जो कुठल्याही रासायनिक रंगापेक्षा अति उत्तम मानला जातो. ज्यामुळे त्वचा रोग नाहीसा होत असे आयुर्वेदाने सांगितले आहे. परंतु ही पारंपारिक माहिती आताच्या पिढीपर्यंत येत नसल्याने रंगपंचमीत रासायनिक रंगाचा बेसुमार वापर होताना दिसत आहे. हल्ली पळस वृक्षाचे कमी झालेले महत्त्व त्याच्या विरळ होण्याचे कारण बनत आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो असले तरी उदास आणि खिन्न झालेल्या ओसाड शिवारात गडद लाल, नारंगी, तांबड्या रंगात फुललेला पळस निसर्ग मनालाही भुरळ घालत आहे की काय? असा भास होत आहे. काही का असेना पण वाटसरूंना तर नक्की भुरळ घालत आकर्षित करीत आहे.