
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- आपल्या अभिनयासोबतच वेगवेगळ्या वादासाठी कंगना रनौत ही नेहमीच तिच्या बेताल वक्तव्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. सध्याच्या घडीला बॉलीवूडमध्ये सर्वाधिक वादग्रस्त अभिनेत्री म्हणून कंगनाकडे पाहिलं जातं. तिचं बॉलीवूडमधल्या अनेक सेलिब्रेटींशी भांड़ण आहे. हल्ली कंगनानं राजकीय वक्तव्य करुन सनसनाटी निर्माण कऱण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी तिनं तर देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक होतं. खरं स्वातंत्र्य हे आपल्याला 2014 मध्ये मिळाल्याचे सांगितले होते.
आताही कंगना तिच्या अशाच बेताल वक्तव्यानं चर्चेत आली आहे. त्यामध्ये तिनं पंजाबमध्ये सरकार स्थापन होताच सरकारवर टीका केली आहे. कंगनानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केले आहे. त्यामध्ये तिनं नुकतंच पंजाबमध्ये जे आपचे सरकार स्थापन झाले आहे त्यावर कडाडून टीका केली आहे. ती म्हणते,तुकडे तुकडे गँग पुन्हा अॅक्टिव्ह झाली आहे म्हणायची. कंगनाच्या या विधानामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर सडकून टीका केली आहे. त्याचा परिणाम सोशल मीडियावर कंगनावर टीकेची झोड़ उठली आहे. नेटकऱ्यांनी तिला अर्वाच्य शब्दांत सुनावलं आहे.
यंदाच्या विधानसभेमध्ये पंजाबमध्ये आपनं मोठा विजय मिळवला आहे. आप पक्षाचे भगवंत मान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यावर कंगनानं टीका केली आहे. आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदासाठी मान यांची निवड केली आहे. त्यावर देखील कंगनानं टीकास्त्र सोडले आहे. सध्या कंगना चर्चेत असलेल्या द काश्मिर फाईल्स या चित्रपटामुळे वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये करत आहे. तिनं दोन दिवसांपूर्वी कुटूंबियांसमवेत हा चित्रपट पाहिला. त्यावर तिनं देशातील मुस्लिम लोकसंख्येविषयी भाष्य केले होते. यावेळी तिनं चाहत्यांना हा चित्रपट आवर्जुन पाहण्याचे आवाहन केले आहे.