
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पिंपरी-चिंचवड (पुणे) :- ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे जे गट पडलेले आहेत ते चुकीचे आहेत. हिंदू- मुस्लिम यांनी एकत्र राहण्याची गरज असून, ते याच देशातील आहेत. असे परखड मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. नाना पाटेकर म्हणाले की, हिंदू आणि मुस्लिम इथलेच आहेत. त्यांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. त्यांनी तसे राहावे. द काश्मीर फाईल्स चित्रपटामुळे जे गट पडले आहेत ते चुकीचे आहेत. चित्रपट अद्याप पाहिला नसल्याने अधिकचे बोलणे उचित ठरणार नाही.
एखाद्या चित्रपटावरून अशी काँट्रॅव्हर्सि होणे बरे नाही, असे नाना म्हणाले. पुढे ते म्हणाले की, हा तेढ कोणता समाज निर्माण करत नाही. ज्या व्यक्ती अशा पद्धतीने तेढ उसळवतो, त्यांना हे प्रश्न विचारायला हवेत. सगळे सलोख्याने राहत असताना असे मध्येच बिबा घालणे योग्य नाही. चित्रपट पाहा, त्यातील वस्तुस्थिती कोणाला पटेल, कोणाला पटणार नाही. त्यामुळे गट पडणे साहजिकच आहे. पण तेढ निर्माण करणे चुकीचे आहे, असे परखड पट नानांनी मांडले आहे.
पुढे ते म्हणाले की, आपल्याला एकमेकांचा आधार वाटणे गरजेचे आहे. आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही, असे जोपर्यंत दोन्ही समाजांना, तुम्हा-आम्हा भारतीयांना वाटत नाही तो पर्यंत हे असे पोळी भाजणारे खूप असतील. परदेशी व्यक्तीचा विषय आला की सगळे लगेच भारतीय होतात. मग अशावेळी जात-धर्म का आठवतात. त्यामुळे सर्वांनी आपण भारतीय आहोत एवढंच मानून चालायचे.