दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
आज समाजात दुःख, दैन्य ,अंधश्रद्धा , निरक्षरता,अति धार्मिकता या घटनांमुळे समाज आतून पोखरलेला आहे. त्यामुळे माणुसकी लयाला जाते की काय याची भीती आता मनात निर्माण झाली आहे? त्यामुळे गावोगावी माणुसकीची शाळा भरविण्याची वेळ आली आहे. काही साधू ,संत, मंहत, महाराज यांच्यावरील विश्वास आता कमी होत आहे,.व्याख्याते, समाजसुधारक,समाजप्रबोधनकार यांनी समाजाला माणुसकी शिकविली होती, त्याकडे आता हेतूपरस्पर डोळेझाक केली जात आहे, शाळा महाविद्यालयातून माणुसकीची संस्कार केले जातात.
पण मोबाईल मुळे त्यांचा वेळ वेगवेगळे गेम खेळण्यात वाया जात आहे आणि त्यातील वाईट कृत्ये पाहुन युवा पिढी बिघडत आहे. आणि माणसातील माणुसकी कमी होत आहे, या समस्येच्या मुळाशी सर्वांनी जाणे अतिशय गरजेचे आहे, स्वतः जन्मदात्या आई- वडीलांना मुले सांभाळत नाहीत ही फार मोठी सामाजिक शोकांतिका आहे. त्यामुळे वृद्धाश्रमाची संख्या दिवसें दिवस वाढत आहे, हे सत्य नाकारून आपणास चालणार नाही../किती तरी मुले आई-वडिलांना घरातून काढून टाकत आहेत, सुना सासू -सास-यांना एकत्रित नकोच म्हणतात.
म्हणून वरील लोक रेल्वेटेशनवर बसस्थानकावर एखाद्या मंदिराशेजारी, गर्दीच्या ठिकाणी पोटाची खळगी भरण्यासाठी रूपया रूपयांची भीक मागत आहेत. त्यामुळे माणुसकीचा अंत होण्याकडे वाटचाल चालू झाली आहे. सर्वजण वाईट नाहीत पण वाईटांची संख्या वाढत आहे. माणसाची हाव वाढली आहे इमल्यावर इमले बांधत आहेत, किती इमले (मजले) बांधावे याचे त्यांना भान राहिले नाही .दुसऱ्या पेक्षा आपला मजला वर झाला पाहिजे. ही जीवघेणी स्पर्धा सध्या मोठमोठ्या शहरात, महानगरात वाढली आहे. त्यामुळे ते कोणाचाही विचार करताना दिसत नाही .
कोणालाही जवळ घेत नाही त्याची हाव वाढतच जात आहे. माणसाला पुरण्यासाठी फक्त सात फूट जागा लागते असे म्हणतात. तरीही शेती ,बंगले ,गाड्या- माड्या यांची वाजवीपेक्षा जास्त खरेदी केली जात आहे. म्हणून म्हणतो माणुसकी पेरणे काळाची गरज आहे. माणसावर चांगले संस्कार हवेत, माणूस हा बोलणारा प्राणी आहे ,त्यांनी सर्वांना सोबत घेऊन चालावे ,मोठ्यांचा आदर करावा गोरगरिबांना सांभाळावे. रंजले- गांजलेल्यांना आधार द्यावा, हे आता पुस्तकात वाचावे लागत आहे, प्रत्यक्ष कृती कमी होत आहे,
म्हणुन माणसावर चांगले संस्कार करावेत. सध्या तरुण मुले-मुली घर सोडून जात आहेत.कारण त्यांच्यावर म्हणावी तशी चांगले संस्कार झाले नाहीत .
बरेच जण विशेष: झोपडपट्टी तील मुले, मुलींना वाईट,व्यसनी दुराचारी,व्याभिचारी,जुगारी बनत आहेत.अल्प सुखासाठी संपूर्ण आयुष्य बरबाद करत आहेत. क्षणभर सुखा साठी संपूर्ण वंशाचा नाश करत आहेत. त्यांना वेळीच आवर घालणं हे सर्वांच्या हिताचे आहे, म्हणून माणुसकी पेरणे आज काळाची गरज बनली आहे. समाजात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे .जो तो मनुष्य पानसुपारी (टेबलाखालून) मागत आहे ,याची संख्या वाढत चालली आहे. गोरगरिबांचे नको तेवढे हाल होत आहेत. त्यांना कोणी समजून घेणारे राहिले नाहीत,अशी अवस्था झाली आहे. “मेलेल्या माणसांच्या डोक्यावरचे लोणी खाण्याची म्हण प्रत्यक्षात येते की काय? याची भिती वाटत आहे. सगळीकडे घोटाळेच घोटाळे चालू झाले आहेत.
आरोप-प्रत्यारोप एकमेकावर रोज करत आहेत. त्यामुळे नवीन पिढीवर विघातक परिणाम होत आहेत. म्हणून माणुसकीची गरज आता निर्माण झाली आहे.मटका ,जुगार ,नशीली पदार्थ, तस्करी या गोष्टीचे आता सर्वत्र जोरदार पीक येत आहे, असे जर काही काळ चालू राहिले तर मानव वाईट विचारांकडे व वाईट कृतीत बुडवून गेल्याशिवाय राहणार नाही. मानवी मूल्ये रसातळाला जातील. सिनेसृष्टीतील काही डायलॉग बोलून तरुण वाममार्गाला लागत आहेत, तसेच करण्यासाठी अवैध धंदे करत आहेत, चिनी मौज करण्यासाठी काही मुली वाटेल त्या मार्गाला जाण्याच्या तयारीत आहेत.
त्यामुळे दररोज कुठेतरी बलात्कार ,अपहरण, अतिप्रसंग, छेडछाड ,एकतर्फी प्रेम असे गुन्हे घडतच आहेत या सर्व गोष्टीला माणुस जबाबदार आहे. म्हणून संत बहिणाबाई माणसाला उपदेश करतात.”अरे माणसा माणसा कधी होशील माणूस” जसे निसर्गात आपण बी पेरतो ते अंकुरते मोठे होते त्याला फुले ,फळे येतात या सर्व गोष्टी करताना ऊन,वारा वादळ पाऊस वीजांचा कडकडाट याचा सामना करून आपले अस्तित्व टिकवून ठेवते. तसे मानवाने आपल्यावर झालेले संस्कार टिकून ठेवावे,मोठ्यांचा आदर करावा ,गुरूंना सन्मान द्यावे,देशाची सेवा करावी. रंजले गांजलेल्याना जवळ घ्यावे. म्हणून तर माणूसाला माणूसकी शिकवावी लागते.
समाजाच्या बांधिलकीत माणसं रुजवून त्यांच्यावर चांगले संस्कार केले तर त्यातून चिरंतन माणुसकी निर्माण होईल, सध्या गल्लोगल्ली शेठ ,युवा नेतृत्व ,उमलते नेतृत्व ,आमचे जिवलग,राजा माणूस, असे नानाविध उपाद्यी लावून बॅनरबाजी केली जात आहे, खरी बाजू पाहिली तर बऱ्याच जणांची वाईट परिस्थिती आहे. स्वतःच्या घरातील माणसांची अवस्था पाहवत नाही, बाहेर मात्र दादा ,अण्णा, काका, तात्या, भैय्या,भाऊ अशी विशेषणे चालू झाली आहेत ,हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे असे मला वाटते काही मोठे भांडवलदार कामगारांना कंपनीमध्ये ठेवून कमी मोबदला देऊन आर्थिक शोषण करतानाचे चित्र पाहण्यात येत आहे, उसाच्या कारखान्यातील कामगारांना कमी पैसे देऊन जास्त काम करून घेताना दिसत आहेत.
वीटभट्टी वरील कामगारांना सुद्धा ठेकेदार कमी मोबदला मध्ये वापरून घेत आहेत, असे कितीतरी गोष्टी आहेत की वर्षानुवर्षे चालत आहेत, ‘उचल’ नावाचा शब्द फार गोंडस आहे तो शेवटी माणसाला उचलतो हे कटू सत्य आहे ,म्हणून मानवी समाजात त्याला माणुसकी शिकवावी लागेल ,तरच मानवी संस्कृती टिकेल नाही तर येणाऱ्या काळात मानवी मूल्ये भुईसपाट होतील ,सर्वत्र अराजकता माजेल या गोष्टीला स्वतः मानव जबाबदार असेल , असे वाचायला मिळाले की
एक माणूस पन्नास खून करीत आहे, विनायकी नावाच्या हत्तीणीला एका इसमाने स्फोटिके खाऊ घातल्या मुळे ती मरण पावली ,किती भयानक क्रूरता मानवाच्या अंगी आली आहे.
सध्या युद्ध चालू आहेत या अगोदर सुद्धा पहिले, दुसरे महायुद्ध झालेली आहेत, मोठ्या राष्ट्रांनी छोट्या राष्ट्रांच्या शहरावर अणुबॉम्ब टाकून बेचिराख केले, काही हुकूमशाहानी लोकांचा अतोनात छळ केला .अत्याचार केला. आणि ते स्वतः संपून गेले, परंतु त्यांची, क्रुरता पाठीमागेच राहिली ,बरेच जण सकाळी मित्र असतील दुपारी शत्रू होतील ,सायंकाळी एकमेकाचे पाहुणे म्हणून समारंभ साजरा करतील, यात शंका नाही पण माणुसकी सध्या दूर जात आहे हे त्रिकाल सत्य नाकारून चालणार नाही.
साहित्यिक
प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपतराव अहमदनगर