दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
माधव गोटमवाड
आंबा हे आपले राष्ट्रीय फळ आहे. पण गेल्या दोन वर्षापासून गावरान आंबा दुर्मिळ ठरला आहे. निसर्गाचे बदललेले हवामान व अप्रतिकूल वातावरणामुळे गावरान आंब्याला सलग दोन वर्षांपासून तडाखा बसला होता.पण यावर्षी पोषक वातावरण व मुबलक पाणी, हवामान चांगले असल्यामुळे यावर्षी आंब्याच्या वृक्षाला चांगली फळधारणा लागली आहे. त्यामुळे लवकर चाखायला मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. कंधार तालुक्यातील बाचोटी, गोगदरी, चिंचोली, नंदनवन, अंबुलगा, गऊळ, हरबळ, दिग्रस, गुंटूर इत्यादी ठिकाणच्या आमराई प्रसिद्ध होत्या.
पण आज घडीला आमराई नावाला शिल्लक असल्याचे दिसत आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात आंब्याचे एकतरी झाड असायेचे. पण ते आता काहीच शिल्लक राहिली नाहीत. तुरळक ठिकाणीच गावरान आंब्याचे झाड पाहावयास मिळतात. एकेकाळी आंब्यावरच शेतकऱ्यांची व्यवसाय चालायचे. रोजगाराला कामं मिळायचे. चार पैसे शिल्लक राहायचे. परंतु मागील दोन वर्षापासून बघितले तर निसर्गाच्या चक्रामुळे अनेकांसाठी गावरान आंबा दुर्मिळ झाला आहे. अलीकडच्या काळात बाजारात विविध प्रजातीची आंबे विक्रीसाठी येत असले तरी ग्रामीण भागात गावरान आंब्यालाच विक्रमी मागणी असायची. त्याचे कारण ही तसेच होते.
कुठल्याही रासायनिक प्रक्रियेशिवाय पिकवलेला गावरान आंबा यावर्षी मात्र ग्रामीण भागासाठी लवकर चाखायला मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे. आजी-आजोबांनी लागवड केलेली तर कोठे नैसर्गिक उगवण झालेल्या शेतातील गावरान आम वृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड झाल्याची दिसत आहे. गावरान अमराया नष्ट होऊन आम रसाची चव दुर्मिळ झाल्याचे चित्र कंधारसह ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. ‘दादा लगाये आम और खाये पोता’ या म्हणीप्रमाणे प्रत्येक गावागावात नामांकित गावरान आमराया अस्तित्वात होत्या.
मात्र अलीकडील काळात शेतकऱ्यांनी झाडाखालची पिके वाढत नसल्याने गावरान आंब्याची विस्तीर्ण झाडे तोडून नवीन संकरित कलमीकरण केलेली विविध आंब्याच्या झाडाची लागवड केली त्यामुळे ग्रामीण भागात आता गावरान आंबे दुर्मिळ झाले. सध्या क्वचीतच एखाद्या ठिकाणी गावरान आंब्याचे झाडे दृष्टीस पडतात. परिणामी खारक्या, नारळ्या, केसाळ्या, केळ्या, सेंद्र्या, शेप्या, खऊट, गोट्या, तुरट्या, चिकाळ्या आधी मौल्यवान गावरान आंब्याची सर्रासपणे सुरू झालेली वृक्षतोड आमराया दुर्मिळ होण्यास कारणीभूत ठरली.
उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाकडे जायची वेगळीच घाई असायची. मीठा मिरच्या सोबत कच्चा कैरी खाण्याची वेगळीच मजा असायची. त्या खाऊन खेळण्या-बागडण्यात गेलेले बालपण आता जवळपास इतिहास जमा झाले आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आसे असले तरीही विरळ प्रमाणात असलेली आंब्याची झाडे यंदा बहरले असून पुढील वातावरण अनुकूल राहिल्यास गावरान चवीचा आनंद घेता येणार हे मात्र नक्की.