दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
‘इतिहासाच्या पानावर
रचलं जावं तुमचं नाव
वास्तवादी रचनेचे उमटावेत
मग प्रत्येक पानावर घाव.’
नांदेड :- नांदेड येथील प्रतिभावान साहित्यिक प्रज्ञाधर ढवळे सर यांच्या विषयी लिहावं तेवढं कमीच आहे. ओंजळीत असलेल्या फुलांचा सुगंध आपण लपवू शकत नाही. त्याच प्रमाणे ढवळे सरांचे कर्तृत्व, साहित्यविषयक योगदान आपण नाकारु शकत नाही. सौदर्यंदृष्टीची जाण असणारा कवी, तेवढाच विद्रोही देखील आहे. आपल्या लिखाणाच्या आगळ्यावेगळ्या शैलीची जादू त्यांनी रसिकमनावर शब्दांच्या माध्यमातून घातली आहे. आज त्यांचा जन्मदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनपटाचा थोडक्यात घेतलेला आढावा.
कंधार तालुक्यातील कुरुळा या छोट्याश्या गावात सूर्यकांत आणि विष्णूबाई यांच्या पोटी प्रज्ञाधर ढवळे यांचा जन्म ५ एप्रिल १९७९ रोजी झाला. वडील बांधकाम मिस्री होते. परंतु काका शिक्षक असल्यामुळे बालपण त्यांच्या तालमीत शिस्त आणि संस्कारात गेले. वास्तव्य खेडेगावात असल्यामुळे ग्रामीण जीवन त्यांनी भरभरुन अनुभवले. ग्रामीण भागातील अनिष्ठ प्रथांची त्यांना चिड यायची. खरतर विद्रोह हा त्यांच्या नसानसांत ठासून भरलेला होता. या विद्रोहाच्या ठिणगीनेच त्यांच्यातील कवीमन जागृत केले. त्यांच्या कविता वास्तवाची धग सोसून निर्माण झालेल्या असतात. म्हणूनच त्या रसिकमनावर अधिराज्य गाजवतात.
आज ते प्रसिध्द साहित्यिक, कवी, समीक्षक आणि कथालेखक देखील आहेत. सूत्रसंचलन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. जबरदस्त सादरीकरण आणि पहाडी आवाजाने श्रोते मंत्रमुग्ध करण्याची कला त्यांना अवगत आहे. त्यांचे साहित्य महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रात प्रसिध्द होत असतं. ते कविता, ललित, ग्रामीण कथा, अग्रलेखातून आपले परखड मत सातत्याने मांंडतात. नव्या साहित्यिकांसाठी ते मार्गदर्शक आहेत. संधी ही प्रत्येकालाच मिळायला हवी. यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. ढवळे सर व्यवसायाने शिक्षक असून सध्या जवळा देशमुख ता.लोहा येथे कार्यरत आहेत.
शिक्षक आणि साहित्यिक या दोन्ही भूमिका बजावतांना त्यांनी आपल्यातील साहित्यिक सदैव जिवंत ठेवला आहे. यामुळेच २०११ रोजी त्यांच्या ‘प्रीत आणि प्रहार’ या कविता संग्राहाचे प्रकाशन झाले. तसेच २०१७ रोजी ‘अग्निध्वज’ या कवितासंग्रहाचे यशवंत मनोहर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. २०१७ रोजी त्यांनी पहिले आंबेडकरी विचारवेध संमेलन यशस्वी पार पाडले. चिमूकल्यांच्या बालमनातील सूप्त कवीला जागृतकरण्यासाठी भव्य कवीसंमेलने आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले आहे.
बालक हे उद्याचे आधारस्तंभ म्हणून महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करुन बालकांच्या मनात उदात्त विचारांचे बीज रुजवणे हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा पैलू, ढवळे सर म्हणजे चालते फिरते ज्ञानदानाचा विचारमंचच, कुणालाही सदैव मदतीस तत्पर असलेली व्यक्ती. ते एक कर्तव्यनिष्ठ शिक्षक, आदर्श पती. तसेच आदर्श पालक देखील आहेत. सप्तरंगी साहित्य मंडळाचे ते पदाधिकारी असून मंडळाचा कणा आहेत. त्यांच्या कल्पकतेतून प्रत्येक पौर्णिमा ही ‘काव्यपौर्णिमा’ व्हावी ही संकल्पना त्यांनी वास्तवात उतरवली.
त्यांच्या पुढाकाराने दरमहा एक अशा ५३ काव्य पौर्णिमा साजऱ्या झाल्या आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवेदित कवींना हक्कांचे काव्यपीठ निर्माण करुन दिले. आज पर्यंत न चूकता काव्यपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होते. भर पावसात काव्यपौर्णिमेचा आनंद श्रोते आणि कवींनी देखील घेतला आहे. अगदी पूर्वीपासूनच त्यांना अंधश्रध्देची प्रचंड चिड आहे. म्हणूनच अमावस्या आणि पौर्णिमेचे औचित्य साधून स्मशानभूमीमध्ये कविसंमेलने आयोजित करुन एक आगळावेगळा उपक्रम राबवण्याची धमक त्यांच्यात आहे.
समाजातील जातीभेदाच्या भिंती दूर व्हाव्यात, असे त्यांना मनोमन वाटते. त्यासाठी त्याची सुरुवात पोटजाती पासून व्हावे असे त्यांना वाटते. म्हणून कालवश दिपक सपकाळे लिखीत ‘पोटजात’ या लघुचित्रपटामध्ये त्यांनी काम केले. यातून त्यांनी जाती पोटजातीवर प्रहार केला. त्याचे दोन भाग लिहून तयार आहेत. लिखाणा बरोबर अभिनय हे खूपच कमी जणांना जमतं. पण ‘नाही’ हा शब्द ढवळे सर यांच्या शब्दकोषातच नाही. मानवाने रोजच्या दैनंदिनीपासून निसर्गाच्या सानिध्यात यावे.
म्हणून कंधारच्या भुईकोट किल्यामध्ये ‘काव्य दरबाराचे’ आयोजन केले. सतत प्रयत्नशील असणारा वैशिष्ट्यपूर्ण बुध्दीमत्ता लाभलेल्या या लेखकाने जीवनात असंख्य माणसं जोडली आहेत. हीच त्यांची श्रीमंती आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे मोठेपण आहे.
‘व्यवस्थेच्या छाताडावर
करुन विद्रोहाचा शृंगार
भित नाही कुणाच्या बापाला
ढवळे यांच्या लेखणीची धार’
अशा या निर्भीड बाण्याच्या अष्टपैलू, बहुआयामी कवी, लेखक तथा कथाकारास वाढदिवसानिमित्त अनेकानेक मंगल कामना व्यक्त करते.