
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
चंद्रपूर :- गाव जंगलालगत असल्याने बिबट्या गावात यायचा आणि बकऱ्या कोंबड्यावर ताव मारून जायचा. मागील सहा महिने त्याचा हा नित्यक्रम झाला होता. बकऱ्या कोंबड्यावर ताव मारण्यास चटावलेल्या बिबट्याला घरात घुसला खरा; पण कुटूंबाने मोठ्या शिताफीने स्वत:चा जीव वाचवत बिबट्याला घरात कोंडून घेतले. घटनेची हकीकत असी की, सावली तालुक्याचे ठिकाणापासून उसेगावचे 6 किमी अंतर आहे. गावाशेजारी जंगल असल्याने वन्यप्राण्यांचा नेहमीच धोका असतो.
या परिसरातील जंगलात वाघ, बिबट्यांचे वास्तव्य आहेच. मागील सहा महिन्यांपासून एक बिबट गावात पहाटेच्या सुमारास नेहमी घुसायचा आणि शेळ्या, कोंबड्यांवर ताव मारून निघून जायचा. गावात बिबट वाघ येत असल्याने कुणाचीच हिंमत त्यांना रोखण्यापासून होत नव्हती. त्यामुळे बिबट्याचा हा प्रकार नित्य नियमाने सुरूच होता. भगवान निंबाजी आवारी यांचे घर जंगलालगत शेताला लागून आहे. यापूर्वी बिबट्याने दोनदा त्यांच्या घरात घुसून कोंबड्यावर ताव मारला होता.
बकऱ्या, कोंबड्या या पाळीव प्राण्यांच्या रक्ताची चटक लागल्याने आज पहाटे पुन्हा एकदा बिबट्या त्यांच्या घुसला. पती, पत्नी व मुले साखर झोपेत होते. बिबट्या थेट पत्नी सिंधूबाई यांच्या खाटेखाली लोळला होता. सिंधूबाई यांना जाग आली. खाटेखाली बिबट असल्याचे लक्षात येताच त्यांनी हा प्रकार पतीला सांगितला. बिबट्या गुरगुरायला लागला. अख्खे कुटूंब मृत्यूच्या दाढेत होते.भगवान यांनी मोठ्या शिताफीने या प्रसंगाचा सामना केला. मुले आणि पत्नीला धरून ते घरातून बाहेर पडलेत. बिबट्याला घरात अडकवून दार बंद करून घेतला.
बिबट्या एका घरात जेरबंद झाल्याची माहिती मिळताच गावात कल्लोळ सुरू झाला. आवारी यांचे घराकडे अडकलेल्या बिबट्याला पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. स्थानिक वनकर्मचाऱ्याच्या मदतीने सावली वनविभागाला घरात बिबट अडकल्याची माहिती देण्यात आली. जिल्हा वरिष्ठ वनाधिकारी खाडे यांचे नेतृत्वात वनपरिक्षेत्राधिकारी कामडी, परिक्षेत्राधिकारी राजू कोडापे, वासुदेव कोडापे, इको प्रोचे बंडू धोतरे, पशुवैद्यकीय अधिकारी कुंदन पोचलवार, आशीष बोरकर तसेच सावली वनपरिक्षेत्राधिकारी यांची इको प्रो चमू, पोलिस प्रशासन आणि अतिशीघ्र कृतीदल चंद्रपूर यांचा ताफा उसेगावात पोहचला.
तब्बल पाच तासानंतर साडेआठच्या सुमारास घरात बंदीस्त बिबट्याला पिंजऱ्या पकडण्यासाठी रेस्क्यू करण्यात आले. बकऱ्या कोंबड्यावर ताव मारण्याच्या नादात घरात अडकलेल्या बिबट्याला रेस्क्यू यशस्वीकरून वनविभागाने ताब्यात घेतले. त्यानंतर आवारी कुटुंबीयांसह अख्या गावाने सुटकेचा नि:श्वास सोडला. वनविभागाने उसेागावात पिंजऱ्या पकडलेल्या बिबट्यालासावली येथे आणून सादागडच्या जंगलात नेण्यात आले आहे.