दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
– बालपण आणि शिक्षण :-
१० एप्रिल १९७७ कबनूर येथे श्री. सिताराम माने यांच्या सामान्य कुटुंबात शोभाताई यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पंचगंगा सहकारी साखर कारखाना गंगानगर येथे अकौंट विभागात कार्यरत होते. शिस्त आणि सतत प्रयत्नरत राहणे याचे बाळकडू त्यांना वडीलांच्याकडूनच मिळाले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कबनूर हायस्कूल कबनूर येथे झाले.
अकरावी बारावी आणि बी. ए. क्रमशः गंगामाई गर्ल्स हायस्कूल व कन्या महिविद्यालय इचलकरंजी येथे झाले. त्यानंतर डिप्लोमा इन काॅम्पुटर अॅपलीकेशन हा संगणक कोर्स शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सायबर काॅलेज , कोल्हापूर येथून त्यांनी पूर्ण केला. अर्थशास्र हा विषय घेऊन शिवाजी विद्यापीठाची एम् . ए. पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी शिक्षणशास्र बी. एड्. हा व्यावसायिक कोर्स पूर्ण केला.
उच्चशिक्षण व व्यावसायिक शिक्षण घेऊन नोकरी मिळाली नाही. म्हणून अपयशाने खचून न जाता त्यांनी जीवनाची व जगण्याची लढाई अर्धात सोडली नाही. उलट त्यांनी आपल्या दोन मुलांना पती शंकर यांच्या श्रमाचे भान ठेवत चांगले व्यावसायिक शिक्षण दिले. मोठा मुलगा एका नामांकीत कंपनीत नोकरी करत आहे तर लहान मुलगा पुढील शिक्षण शिकत आहे.
– संसार आणि समाजसेवा :-
उच्चमाध्यमिक शिक्षण पूर्ण होताच लग्न झाले. संसारवेलीवर निलेश आणि रूपेश अशी दोन चाणाक्ष आणि गोंडस मुले झाल्याने घराचे गोकुळ झाले. सासर सोन्याची शिरोली असले तरी लग्माअगोदरचा व लग्नानंतरचा सर्व जीवनप्रवास कबनूर येथेच सुरू आहे. अर्थात जन्मभूमी आणि कर्मभूमी ही कबनूरच राहिली.
घरची परिस्थिती सामान्य असल्याने सुरूवातीला श्री. धुळोबा एच. पी. गॅस एजन्सी कबनूर येथे लिपीक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर स्टेटबॅक आॅफ इंडिया SBI मार्फत त्यांनी SBI मिनी बॅक अर्थात ग्राहक सेवा केंद्र सुरू केले. या ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून कबनूर आणि लगतच्या परिसरातील नागरिकांना बॅकिंग सुविधा अल्प दरात उपलब्ध करून दिली.
– वसा आणि वारसा :-
अनेक शतके चूल आणि मूल हेच काम स्रियांसाठी होते. महात्मा जोतीराव फुलांनी सन १८४८ ला मुलींच्यासाठी पहिली शाळा सुरू केली. रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा उपयोग बहुजन लोकांच्या सुधारणेसाठी आणि विकासासाठी केला. विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईनं जन्मोजन्मीचं झोकड खांद्यावरून व मनावरून उतरलं गेलं.
भारतीय संविधानामुळे स्रीवर्गाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच शिक्षणाची द्वारे खुली झाली. ही ज्ञानाची कवाडे वंचित, उपेक्षित आणि दलित बहुजनवर्गाला स्व प्रतिमा व अस्मिता निर्माण करण्यास महत्त्वाची ठरली. केवळ शिक्षणामुळे आणि सततच्या प्रयत्नामुळे मौजे कबनूर येथील चर्मकार समाजातील पहिली ग्रामपंचायत सदस्या होण्याचा व सरपंच होण्याचा मान त्यांना मिळाला.
– महिला वर्गासाठी प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व :-
कबनूर गावच्या विद्यमान सरपंच आणि आमच्या भगिनी सौ. शोभा शंकर पोवार यांचा जीवनप्रवास महिलावर्गासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. राजकारणाचा कोणताही वारसा नसताना तत्कालीन राष्र्टवादीचे कार्यकर्ते श्री. श्रीनिवास पाटील यांच्यामुळे सन २०१० साली पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्या म्हणून त्यांनी निवडणूक लढवली. मात्र पहिल्यांदा विजयाची संधी थोड्या मताने हुकली. तथापि अपयशाने त्या खचल्या नाहीत. खचून न जाता पुन्हा त्याच वाटेवर चालत राहणे निवडले.
पुन्हा श्री. श्रीनिवास पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली त्या सन २०१५ साली नव्या जोमाने निवडणुकीस उभ्या राहिल्या. यावेळी ही अवघ्या काही मतांनी त्यांचे राजकीय यश दूर राहिले. त्यानंतर त्यांनी तिसर्यांदा पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील, संचालक प्रमोद पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली सन २०२० साली ग्रामपंचायत निवडणुक रिंगणात त्या उतरल्या. आणि यावेळी त्या निवडणुकीत विजयी झाल्या. एवढ्यावर न थांबता त्या कबनूर गावच्या प्रथम नागरिक अर्थात मौजे कबनूरच्या सरपंच झाल्या.
– राजकारणाबरोबर समाजकारण :-
सरपंच म्हणून काम करताना त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमांतून विविध विकास कामे केली. सर्वप्रथम त्यांनी महिलासक्षमीकरणाला प्राधान्य दिले. शासनाच्या विविध योजना राबवून त्याचा फायदा महिला वर्ग तसेच अपंगाना मिळवून दिला. कोवीड काळात त्यांनी उत्तम कामगिरी केली. त्यामुळे कोवीडची झळ ग्रामस्थांना लागली नाही. शासनाची लसीकरण मोहीम नेटाने राबवली.
अर्थातच कोवीड 19 चा प्रार्दुभाव कमी करण्यात त्यांनी यश मिळविले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन बेळगांव येथील नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फौंडेशन व हेल्थ अॅन्ड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगांव यांचा त्रिराज्यस्तरीय ( कर्नाटक, महाराष्र्ट, गोवा ) सामाजिक सेवा गौरव पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आले आहे.
– समाजप्रिय, कुटुंबवत्सल शोभाताई :-
त्यांच्या यशाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, माझ्या या यशात गावचे नागरिक, पक्षाचे वरिष्ठ नेते , सहकारी बंधुभगिनी यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच मला सरपंच पदापर्यंत मजल मारता आली. येथून पुढच्या काळातही असेच काम करीत राहीन. राजकारणात येण्यापूर्वी ही त्यांनी भारत सरकारच्या जनधन योजनेमार्फत ३५० लाभार्थ्यांना फायदा मिळवून दिला.
त्यांच्या या कार्यात पती शंकर पोवार, दीर अविनाश पोवार, संजय पोवार , मुले रूपेश पोवार, निलेश पोवार व पुतण्या अक्षय पोवार यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले. आज त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण म्हणजे त्यांचा वाढदिवस . कुटुंब सांभाळत सतत कार्यमग्न राहणे हा त्यांचा प्रेरणादायी गुण खास महिलावर्गाने सचोटीने घेण्यासारखा आहे. त्यांच्या हातून चांगली समाजसेवा व लोकसेवा घडावी म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे शब्दरूपी अभिष्टचिंतन………!
शब्दांकन
श्री. एम् . एस् . जाधव