
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
कोल्हापूर :- कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे. कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे.
भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना १८ हजार ९०१ मतांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पराभवानंतर आता चंद्रकांत पाटलांचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आलं आहे. कोल्हापुरातील पराभवामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटलांच्या कामगिरीवर पक्षनेतृत्व नाराज असल्याची देखील चर्चा आहे.
कोल्हापुरातून निवडणूक हरल्यास राजकारण सोडून हिमालयात जाईन असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीनंतर केलं होतं. आता भाजपच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटलांच्या या विधानावरुन बॅनरबाजी सुरु झाली आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांना ९६ हजार २२६ मते मिळाली तर भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२६ मते मिळाली आहेत.