
दैनिक चालु वार्ता
जालना प्रतिनिधी
आकाश नामदेव माने
जालना :- भोंग्यांच्या मुद्द्यावर राजकारण तापलेले असताना आता सरकार आणि पोलीस देखील एक्शन मोडमध्ये आले आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी गृहमंत्र्यांनी पोलीसांना सुचना केल्या आहेत. तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्याच्या पोलिस महासंचालकांना आढावा बैठक घ्यायला सांगितली आहे. येत्या काही दिवसांत राज्यात उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीत काय अंमलबजावणी करता येईल, त्या दृष्टीनं तयारी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
कायदा आणि सुव्यवस्था टिकविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही हा प्रकार अतिशय गंभीरतेनं घेतला आहे. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. शिवाय, तेढही निर्माण करू नये. त्याचबरोबर अशा प्रकारची कृती झाली, तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.