दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे दि.२१:- आपत्तीच्या परिस्थितीत मनुष्यहानी टाळण्यासाठी सूचनांचा वेगवान प्रसार होणे महत्वाचे असून सर्व संबंधित विभागांनी तात्काळ प्रतिसादावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे उपस्थित होते.
डॉ.देशमुख म्हणाले, पर्यावरणात होत असलेल्या बदलांमुळे आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. आपत्ती अचानकपणे येत असल्याने त्यादृष्टीने आवश्यक पूर्वतयारी करावी. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून अधिकाऱ्यांनी पाहणी करून आपत्तीची शक्यता असलेल्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करावी. पालखी सोहळ्याच्या वेळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन पालखी मार्गावरील उताराच्या ठिकाणी आणि पाणी साचत असलेल्या ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. पावसाळी पर्यटनस्थळावर होणारी गर्दी लक्षात घेता अपघात होणार नाही यासाठी पूर्व खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
सर्पदंशावरील औषधाचे माहितीपत्रक तयार करून नागरिकांना त्याबाबत माहिती द्यावी. आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील औषधे तयार ठेवावीत. आपत्ती व्यवस्थापनाच्यादृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले. श्री.दिवसे म्हणाले, धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचे व्यवस्थापन करण्यासोबत शहरात कमी वेळात होणाऱ्या मोठ्या पावसामुळे नदीपात्रात होणाऱ्या पूर परिस्थितीबाबत आवश्यक सूक्ष्म नियोजन करावे. नदीपात्रातील अतिक्रमण दूर करण्यात यावे. आपत्तीला प्रतिसाद देण्यापेक्षा आपत्ती आल्यास नुकसान होणार नाही याचे नियोजन आधी करावे.
नद्यांमधील अतिक्रमणे काढण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सर्व सहकार्य करेल. आपत्तीला प्रतिसादासाठी विविध यंत्रणांना आवश्यक साधने आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. मनुष्यबळाचे प्रशिक्षण लवकरच एनडीआरएफमार्फत करण्यात येणार आहे. आपत्तीकाळात उपयोगात आणण्यासाठी देशातील सर्वोत्तम उपकरणे जिल्ह्यात आहेत. आपत्तीच्या काळात परिवहन महामंडळाने रात्रीच्यावेळी धोकादायक भागात बस सुरू ठेवू नये. देशातील सर्वोत्तम एनडीआरएफ टीम पुण्यात असणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. आयुष प्रसाद म्हणाले, जिल्हा परिषदेतर्फे सर्व आरोग्य केंद्रात पुरेशा औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्व लघु पाटबंधारे प्रकल्पांचे दरवाजे काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रकल्पातील गाळ काढण्यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून सामाजिक दायित्व निधीतून १०० जेसीबी यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. ९५ प्रकल्पातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. भोर, वेल्हा, मुळशी, मावळ येथील नाला खोलीकरणाचे काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. साकवांचे सर्वेक्षण करून आवश्यक दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक साधनसामुग्रीची सूची तयार करण्याचे आणि पावसाचे पाणी साचणाऱ्या क्षेत्रात पाण्याच्या प्रवाहातील अडथळे दूर करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ.देशमुख यांनी दिल्या.
पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक के. एम. होसाळीकर यांनी जिल्ह्यातील हवामानाच्या अंदाजाविषयी सादरीकरण केले. देशात यावर्षी सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. हवामानावर प्रभाव पाडणाऱ्या घटकांच्या परिणामानुसार हवामान विभागातर्फे सातत्याने हवामानाचा अंदाज दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, महावितरण, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद, कृषी, बीएसएनएल आदी विविध विभागांनी यावेळी केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.