
दैनिक चालु वार्ता
निलंगा प्रतिनिधी
औराद शहाजानी (सा.वा.) ता. निलंगा
निलंगा :- लातूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या या औराद शहाजानी परिसराला फार महत्त्व आहे आणि अशातच पोलिसांसह प्रशासनातील अनेक विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक अवैध धंद्यांचे भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे राजकीय लोक विकास कामांना बगल देत अवैध धंदे करणाऱ्या लोकांना सांभाळण्याचे काम होत असल्याने गावाच्या युवकांना विकसित औराद पहाण्याऐवजी अवैध धंद्ये वाढलेले पाहुण युवकांचाही कल या वाढत्या अवैध धंद्यांकडे लागलेला दिसुन येत आहे.
येथील चालू असलेल्या गाववस्तीमधील अवैध दारू विक्री तसेच कल्याण- मुंबई , मेन मुंबई मटका आणि दररोज खुलेपणाने वाहतुक करुन संपुर्ण जिल्ह्यात फिरला जाणारा गुटखा यामुळे गोर गरीबांचे संसार उध्वस्त होत आहे तर प्रशासनाचे खिसे भरण्यात येत असल्यामुळे त्यांचे कर्तव्य सध्यातरी नाममात्र ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. अवैद्य धंदे करणारे लोक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या खांद्यास खांदा लावून बैठका करीत असतात त्यामुळेच तर औरादसह , हलगरा , बोरसुरी , तांबाळा , मसोबावाडी , अंबुलगा अ.बु. परिसरात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढत चालल्यामुळे अनेक नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.
त्यामुळेच आणी प्रशासन हे अवैध धंदे थांबविण्यावर उपाययोजना न करता उलट राजकीय लोकांच्या हातचे बाहुले बनत अवैध धंदे करणाऱ्या लोकांना अभय देत आहेत. महाराष्ट्र सरकारने तीन वर्षापुर्वीच महाराष्ट्रात गुटखा बंदी केली असतानाही अन्न औषध प्रशासनातील हलगर्जीपणा करणारे अधिकारी यांना हाताशी घेऊन कांही महाभाग भरदिवसा विविध कंपनीचा गुटखा येथुन जवळच असलेल्या कर्नाटकातून सप्लाय सर्रासपणे करून बाजारत खुलेपणाने विक्री करीत आहेत. त्यामुळे औरादसह परीसरात अवैध दारु , मटका आणी गुटखा यावर प्रशासनाने कार्यवाही करणे तर गरजेचं आहे शिवाय या लोकांवर प्रशासनाचा दबदबा निर्माण करणेही गरजेचं आहे अन्यथा युवा पिढी ही अवैध धंद्यांच्या नादात भविष्य अंधकारमय होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाने या अवैध व्यावसायावर लवकर नियंत्रण मिळवणे गरजेचं आहे.