मुंबई: शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये पराकोटीचं वितुष्ट आलं आहे. दोन्ही पक्ष एकमेकांना रोजच पाण्यात पाहत आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही.
त्यातच ईडीच्या कारवाया सुरू झाल्याने आघाडी सरकारची कोंडी झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांची पत्नी आणि मुलांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याची संपत्ती ईडीने (ED)जप्त केली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं चित्रं आहे. दोन दिवासंपूर्वी इंधनाच्या दरावरून पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यांना बोल लावला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पंतप्रधानांना उत्तर दिलं. त्यामुळे मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यातही दुरावा निर्माण झाला की काय अशी चर्चा होती. परंतु, त्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पडदा टाकला आहे. आमच्या दोघांच्या मनातही ओलावा आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र, शिवसेना-भाजपची युती होणार नाही, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुलाखत घेतली. तब्बल तासभर चाललेल्या या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी मोदींबाबतच्या संबंधावरही भाष्य केलं. महाराष्ट्र संयम जास्त दाखवतो. आम्ही इतक्या वर्ष यांच्यासोबत होतो. अटलजी पंतप्रधान होते. तेव्हा गोध्रामध्ये दंगली झाल्या. त्यावेळी मोदी हटावची मागणी होत होती. त्याचवेळी लालकृष्ण अडवाणी एका सभेसाठी मुंबईत आले होते. अडवाणी घरी आले होते. आम्ही त्यांच्याशी बोलत बसलो होतो. त्यांनी बाळासाहेबांशी बोलायचं म्हणून सांगितलं. त्यामुळे मी आणि प्रमोद महाजन बाहेर गेलो. यावेळी अडवाणींनी मोदींबाबत चर्चा केली. तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं मोदींना बिलकूल हात लावू नका. मोदी गया तो गुजरात गया. हिंदुत्वाला फटका बसेल, असं बाळासाहेब म्हणाले होते, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली.