दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
या सृष्टीचे एक तत्त्व आहे. ते म्हणजे जे नित्य आहे तेच सत्य आहे. आणि मग या सत्याची नित्य प्रचिती घ्यावी, अनुभव घ्यावा. जे सत्य आहे ते मनमोकळेपणाने स्वीकारावे. त्याच्याविषयी आदर व्यक्त करावा कृतज्ञता व्यक्त करावी किंबहुना या सृष्टीमध्ये जे जे नित्य आहे त्याची सतत आठवण ठेवून आपले आयुष्य सुखी आणि समाधानी करून घ्यावे. अशी एक विशेष योजना भारतीय संस्कृतीने परंपरेच्या रुपात रुढ केलेली दिसते. म्हणून तुम्ही जर भारतीय संस्कृतीतल्या सणवारांकडे थोडे बारकाईने बघितले तर ‘सत्यम् परम् धीमहि’ म्हणजे त्या सत्याचेच ध्यान किंवा आराधना करण्याची घोषणा ऐकू येईल.आजचा अक्षय तृतियेचा सण यापेक्षा वेगळा नाही. खरे तर हेच तत्त्व या अक्षय तृतियेमधून जास्त प्रकर्षाने किंवा प्रभावीपणाने लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अक्षय या शब्दातच त्याचे मर्म दडलेले आहे. अक्षय म्हणजे कधीही नाहीसा न होणारा किंवा क्षय न होणारा असा निरंतर, असा त्याचा स्पष्ट अर्थ निघतो. नाहीसे न होणारे एकच सृष्टीतत्त्व आपल्याला पाहायला मिळते. आणि मग या सृष्टीचे बोट धरून चिरंतन आनंद किंवा समाधान मिळवण्याचा मार्ग सांगितला गेला. ज्यामध्ये दडलेले मानसशास्र पुराणकथा किंवा धर्माच्या माध्यमातून व्यक्तीवर बिंबवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कसे तर अगदी अक्षत्तय तृतियेच्यादिवशी पाण्याने भरलेल्या मातीच्या कुंभाची पूजा होते. आणि तो कुंभ गरजूंना अर्पण करण्याची किंवा दान करण्याची परंपरा पाहायला मिळते. याठिकाणी माती,पाणी, या दोनही सृष्टीतल्या चिरंतन टिकणार्या दोन घटकांचा समावेश आहे. त्या मातीच्या घटाची पूजा करून मातीचे महत्त्व तर लक्षात येतेच शिवाय वैशाखासारख्या कडक उन्हाळा असलेल्या महिन्यात पाण्याने भरलेला कुंभ दान करण्याची कल्पना मांडून पाणी किती मूल्यवान आहे हा संस्कार रुजवण्याचे कौशल्य दाखवले गेले आहे. याचा अर्थ माती, पाणी, आकाश, वनस्पती पर्वत, डोंगर, दर्या, नद्या हे असे काही घटक आहेत की दीर्घकाळ किंवा चिरंतन काळ टिकून राहातात. आणि हे नित्य टिकणारे घटकच सत्य मानायचे आणि त्या सत्याची आराधना करून मानसिक समाधान प्राप्त करून घ्यायचे अशी अतिशय मनोवेधक रचना पाहायला मिळते.
सत्याचा स्वीकार
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतियेचा उल्लेख होतो. यादिवशी सोने, घर, किंवा संपत्तीशी निगडीत गोष्टी विकत घेणे शुभकारक मानले जाते. शिवाय या दिवशी केलेले कोणतेही दान हे अधिक पुण्यकारक असल्याचे आग्रहाने सांगितले गेले आहे. या सगळ्या गोष्टी मुहूर्ताच्या माध्यमातून करायला सांगितल्या जातात. यामध्येसुध्दा एक विशेष शास्रही पाहायला मिळते. कारण वेळेचे मूल्यसुध्दा लोकांच्या लक्षात यावे हा त्यामागचा हेतू दिसून येतो. योग्यवेळी योग्य गोष्ट केली तर त्याचे परिणाम निश्चितच चांगले येतात. म्हणून मुहूर्ताचे महत्त्व जाणीवपूर्वक प्राचीन काळापासून सांगितले गेले. वैशाखासारख्या महिन्यात रणरणत्या उन्हामध्ये की ज्या काळात सगळ्यांनाच पाण्याची गरज असते. यावेळी पाणी दान करायला सांगणे म्हणजेच योग्यवेळी योग्य ते दान करून मानसिक समाधान मिळवण्याचा सोपा मार्ग सांगितला गेला. याच काळामध्ये लग्नसराई जोरात असते. म्हणून यावेळी केलेली सोन्याची खरेदी अधिक योग्य मानली गेली. कारण सोनेसुध्दा याच चिरंतन सृष्टीचा किंवा कायम टिकणार्या घटकांमधला एक महत्त्वाचा भाग ठरतो. सोने हे नित्य टिकणारे आहे म्हणून ते सत्य आहे. आणि अशी नित्य टिकणारी वस्तू योग्य मुहूर्तावर खरेदी करून अक्षय सुखाचे आश्वासन आपल्याला मनोमन मिळवता येऊ शकते. हाच या अक्षय तृतियेच्या सोनेखरेदी मागचा हेतू म्हणावा लागेल. याच दिवशी कृता युग संपून त्रेता युगाची सुरुवात झाली. आणि काळाचा हा अक्षय प्रवास प्रत्येकाला सुखावह वाटावा म्हणूनही अक्षय्य तृतिया या दिवसाला मुहूर्ताचे वरदान मिळालेले दिसते. संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या पध्दतीने या अक्षय तृतियेचा सण साजरा होतो. पण सर्वत्र सृष्टीची किंवा निसर्गाशीसंबंधित पूजाअर्चा आराधना केलेली दिसून येते.
वेळेचे महत्त्व
जे नित्य आहे त्याची सतत आराधना केली तर आपल्याला हवा असलेला अक्षय्य आनंदसुध्दा मिळवता येऊ शकतो. शरीरापेक्षाही मनाला सशक्त आणि समृध्द करणारी परंपरा नीट समजून घेतली पाहिजे. केवळ कर्मकांड असलेली ही सणवारांची परंपरा नाही. तर त्यामध्ये अतिशय सुक्ष्मरुपाने मानसशास्र, समाजशास्र किंवा या सृष्टीचे शास्रदेखील दडलेले आहे. अक्षय तृतियेच्यादिवशी फळांचा राजा मानला गेलेला आंबा मुबलक प्रमाणात होतो. तो आंबादेखील गोरगरिबांना द्यावा. म्हणजे स्वतःबरोबर इतरांचाही विचार करावा. मिळालेला आनंद एकमेकात वाटून घ्यावा. हीच त्यामागची संकल्पना आहे. मनुष्याला किंवा समाजाला विचार देत असताना कृतीच्या माध्यमातून त्या विचाराचे संस्कारात परिवर्तन करण्याची ही कला भारतीय संस्कृतीतच पाहायला मिळते. जगातल्या अनेक संस्कृती नष्ट झाल्या. पण भारतीय संस्कृती अक्षय्य आहे हे महत्त्व तरी आपण मान्य केले पाहिजे. खरे तर या सगळ्या सणवारांमध्ये दडलेले हे शास्र उलगडून आजच्या पिढीपुढे मांडले पाहिजे. सुखाबरोबर खर्या आनंदाचा अनुभव काय असतो हे या पिढीच्या लक्षात आणून दिले पाहिजे. खूप सहजपणाने या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्याने त्यामागचे शास्र आणि महत्त्व समजून घेण्याचे परिश्रम कोणीही करताना दिसत नाही. यासाठी तरी या मुहूर्ताचा म्हणजेच वेळेचा उपयोग करता येऊ शकतो.