दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र बुधवार (४ मे) न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
गुरूवारी सकाळी जामिनाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राणा दाम्पत्याला तुरुंगातून सोडण्यात आले आहे. मागील तेरा दिवसांपासून दोघेही तुरुंगात होते. दोघांनाही राजद्रोहाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
दरम्यान तुरुंगातून सुटल्यानंतर खासदार राणा यांना मानदुखीचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरूवारी तुरूंगातून बाहेर येताच त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून आज संध्याकाळी किंवा उद्या त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. मात्र डिस्चार्ज मिळाल्यानंतर राणा दाम्पत्य थेट दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे.
दिल्लीत जावून नवनीत राणा या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राणा यांंनी यापूर्वी आपल्या वकिलांमार्फत लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. यात आपण मागासवर्गीय असल्याने खार पोलीस ठाण्यात पाणीही देण्यात आले नाही. आपला छळ केल्याचा आरोप राणांनी केला आहे. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्य चहा पितानाचा व्हिडीओ ट्विट केला होता. या आरोप-प्रत्यारोपांमुळे काही काळा राजकारण तापलं होतं.
लोकसभा अध्यक्षांशिवाय राणा दाम्पत्य गृहमंत्री अमित शहा आणि गृहसचिवांची यांची भेट घेवून घडलेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर घालण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांना केंद्रीय गृह मंत्रालयाची सुरक्षा प्राप्त आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्य ठाकरे सरकारला थेट दिल्लीतून अडचणीत आणण्याची शक्यता आहे. यावर आता ठाकरे सरकार काय भूमिका घेणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.