दै.चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
पेठवडज :- कोविड-१९ साथीच्या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने आरोग्य विभागात १००% रिक्त पदे भरण्यासाठी मे. न्यास कम्युनिकेशन कंपनी यांची नेमणूक केली, असून कंपनीने २४ आॅक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. अगोदरच परीक्षा कंपनीच्या चुकांमुळे दोनदा होत आहेत. कंपनीच्या चुकां विद्यार्थ्यांना भोगाव्या लागत आहेत, महा विकास आघाडी सरकारची बदनामी होत आहे. फक्त एकच अर्ज केलेल्या हजारो विद्यार्थ्यांना ५०० ते ६०० किलोमीटरहून जास्त अंतरावर परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी नौकरी करण्यासाठी लांबचे ठिकाणे का निवडले असेल. तर त्याचे कारण म्हणजे नांदेड जिल्ह्यात ओपनसाठी जागाच नाहीत, त्यामुळे त्यांनी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर येथे अर्ज दाखल केले आहेत. त्यांची परीक्षा जवळच्या जिल्ह्यात घेण्याऐवजी ५०० ते ६०० की. मी.अंतरावर ठेवले आहेत, ती बदलून जवळच्या जिल्ह्यात घ्यावीत तसेच प्रवेश पत्रावरील चुका दुरुस्त करून विद्यार्थ्यांना होणारा आर्थिक व मानसिक त्रास थांबवावा. सरकार तुम्हाला नौकरी देणे जमत नसेल तर अशा प्रकारचे नवनवीन प्रयोग राबवू नका. १२ तास प्रवास करून विद्यार्थी परीक्षा कशा देतील, अगोदरच पेठवडज सर्कल मधील शेतकरी व कामगार यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यातच सरकारची मदत अजून मिळाली नाही. काही विद्यार्थ्यांना तेवढ्या लांब जाण्यासाठी लागणारे पैसे नाहीत. तेव्हा महा विकास आघाडी सरकारने विद्यार्थ्यांना जवळील जिल्ह्यातील परीक्षा केंद्र उपलब्ध करून द्यावे अशी मागणी पेठवडज सर्कलमध्यील विद्यार्थी व पालक करीत आहेत.