दैनिक चालु वार्ता आटपाडी प्रतिनिधी-दादासो वाक्षे
आटपाडी दि . २८ (प्रतिनिधी )
बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून आखण्यात आलेल्या समन्यायी पाणी वाटप प्रकल्पाच्या उदघाटनासाठी राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील रविवार दि. १२ जुन ला आटपाडीच्या दौर्यावर येणार असल्याची माहिती पाणी संघर्ष चळवळ आणि श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ . भारत पाटणकर आणि आनंदरावबापू पाटील यांनी दिली . याच दौऱ्याच्या दिवशी १०८ गावांना पाणी देण्याच्या उद्घाटनाचे सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या अन्य तालुक्यामध्ये कार्यक्रम होणार आहेत .
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षते खाली आणि राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्या सहभागात हा निर्णय घेण्यात आला . यावेळी विविध अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते .
या बैठकीच्या दरम्यान काही वेळासाठी खासदार शरदचंदजी पवार हे ओबीसींच्या मेळाव्यासाठी गेले होते. त्यामुळे या बैठकीत ठरलेली १२ जुन ही तारीख त्यांना भेटून अंतिम करण्याची जबाबदारी ही डॉ .भारत पाटणकर, आनंदराव बापू पाटील कॉ . संपत देसाई ,चैतन्य दळवी यांच्यावर होती . त्यानुसार १२ जून ची तारीख त्यांना भेटून निश्चित केली गेली आहे.
१९९३ पासून चालु असलेल्या जनतेच्या संघर्षाला अंतिम यश येणारा हा सुवर्ण क्षण असल्यामुळे या कार्यक्रमाची जय्यत तयारी करणे आवश्यक आहे . त्याहृष्टीने नियोजन करण्यासाठी दि .१ जुनला श्रमिक मुक्ती दल व पाणी संघर्ष चळवळीच्या सर्व कार्यकर्त्याची बैठक आटपाडीच्या माणगंगा कृषी विद्यालय येथे सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे . या बैठकीसाठी सर्व कार्यकर्त्यानी आपली सर्व कामे बाजुला ठेवून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डॉ . भारत पाटणकर – आनंदरावबापू पाटील यांनी केले आहे .