दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर घडलेल्या घडामोडींमुळे सध्या महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. शिवसेनेने छत्रपती घराण्याचा अपमान केला, असा आरोप सातत्याने शिवसेनेवर होत होता.
मात्र संभाजीराजेंचे वडील छत्रपती शाहू महाराजांची स्वतःच हा आरोप खोडून काढला. त्यानंतर मात्र अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनीही यावर भाष्य केलं आहे.
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शाहू महाराज छत्रपती आहेत, त्यांचा मान आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या मताबद्दल मी बोलणार नाही. त्यासंदर्भात संभाजीराजेंनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. मी बोललो ते सत्य बोललो, असं संभाजीराजे म्हणाले होते. पण मला एकाच गोष्टीचं दुःख आहे की काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून महाराजांना चुकीची माहिती दिलीये. अशी माहिती देऊन ते संभाजीराजेंना खोटं ठरवतायत आणि दोघात अंतर असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतायत.
फडणवीस पुढे म्हणाले, “संभाजीराजे यांचं नेतृत्व गेल्या सहा वर्षात चांगलं तयार होतंय. मराठा, बहुजन समाजात त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झालीये. असं नेतृत्व तयार झाल्यावर कोणतंही नुकसान भाजपाला विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात होणार नाही. नुकसान कोणाचं होईल हे मी सांगायची गरज नाही. त्यामुळे हे नेतृत्व थांबवण्याचा प्रयत्न कोण करणार हे सामान्य राजकारण कळणाऱ्याला लक्षात येईल.
भाजपाकडून संभाजीराजेंच्या उमेदवारीबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, “मी कोणत्याही पक्षाचं तिकीट घेणार नसल्याचं मला संभाजीराजेंनी सांगितलं. घराण्याची परंपरा पाहता राष्ट्रपती कोट्यातनं भाजपाने समर्थन देऊन त्यांना पदावर बसवलं, तसं अपक्ष म्हणूनही सगळ्या पक्षांनी पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सगळे पाठिंबा देत असतील तर मीही हायकमांडशी चर्चा करीन. कारण माझ्या हातात हे निर्णय़ नाहीयेत. त्यामुळे व्यतिरिक्त मला काही बोलायचं नाही.