दैनिक चालु वार्ता शिरपूर प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
अटारी पुणे झोन– VIII, महात्मा फुले कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र, धुळे आणि कृषि महाविद्यालय , धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत “गरीब कल्याण संमेलन शत प्रतिशत सशक्तिकरण” निमित्ताने वेब संवाद आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र, धुळे येथे दि. ३१ मे, २०२२ रोजी करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे, मा. डॉ. सुभाषजी भामरे, माजी केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री, भारत सरकार तथा खासदार, धुळे लोकसभा मतदार संघ हे होते तर अध्यक्षस्थानी.डॉ. चिंतामणी देवकर, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, धुळे हे होते तसेच व्यासपीठावर डॉ. मुरलीधर महाजन, कृषि विद्या वेत्ता, विभागीय कृषि विस्तार केंद्र, धुळे, डॉ. राहुल देसले, प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, धुळे, प्रा. श्रीधर देसले, उद्यानविद्या वेत्ता, विभागीय कृषि विस्तार केंद्र, धुळे, डॉ. पंकज पाटील, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, धुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्याचे प्रास्ताविक डॉ. पंकज पाटील यांनी केले, प्रास्तविका मध्ये त्यांनी गरीब कल्याण संमेलन शत प्रतिशत सशक्तिकरण कार्यक्रमाचा उद्देश, महत्व उपस्थितांना अवगत करून दिले.तसेच शेतकरी शास्त्रज्ञ सुसावंदाचे महत्व अधोरेखित करून कृषि विज्ञान केंद्र राबवीत असलेल्या उपक्रमाविषयी माहिती देत, यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन शाश्वत उत्पादनाकडे वाटचाल करावी असे आव्हान केले.
डॉ. सुभाषजी भामरे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले कि, मोदी सरकारच्या ८ वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान निधी तसेच पंतप्रधान आवास योजना इ. योजनांद्वारे शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी व उत्थानासाठी कार्य केले आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या कच्च्या मालापासून टिकाऊ उत्पादने तयार करण्यासाठी प्रक्रियायुक्त पदार्थ करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देण्यासाठी विवीध योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी कृषि विज्ञान केंद्र, धुळे मार्फत सुरु आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीकोनातून कृषि विज्ञान केंद्र विद्यापीठाचे नविन व आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचवण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. त्याचीच फलश्रुती म्हणून आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत होत असून शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेती निष्ठ पुरस्कार व कृषि भुषण पुरस्कार यासारखे पुरस्कार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले आहे.
राष्ट्रीयता स्तरावर मा. श्री. नरेंद्रजी मोदी, पंतप्रधान, भारत सरकार यांनी आभासी पटला द्वारे गरीब कल्याण संमेलन शत प्रतिशत सशक्तिकरण या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यांनी शेतकऱ्यांना कृषि विषयक तसेच इतर दैनंदिन योजनांविषयी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्दारे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये डॉ.चिंतामणी देवकर यांनी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती सोबतच विषमुक्त शेतीच्या दृष्टीने वाटचाल करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक कीटकनाशकाएवजी जैविक कीटकनाशके, जैविक खते इ. वापर केल्यास उत्पादनात वाढ होऊन पर्यावरण पूरक शेती होण्यास मदत होणार आहे . शेतकरी बांधवांनी कृषि विद्यापीठाच्या तंत्रज्ञानासोबत कृषि विद्यापीठ निर्मित कृषिदर्शनीचा वापर केल्यास शेतकऱ्यांच्या शेतीविषयक ज्ञानात भर पडणार आहे. तसेच शेती सोबत शेतकऱ्यांनी उत्पन्न दुप्पट करण्याकरिता कृषि व कृषि पूरक प्रक्रिया उद्योगाकडे वाटचाल करणे आवश्यक आहे, त्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी, शेतकरी, महिला आदी यांनी सहभाग घ्यावा असे आव्हान केले.
तसेच कृषि भुषण पुरस्कार २०१९ प्राप्त शेतकरी डॉ. नरेंद्र भदाणे राहणार सामोडे ता. साक्री जि. धुळे यांचा सन्मान मा. डॉ. सुभाषजी भामरे यांच्या हस्ते झाला. तसेच कृषि विज्ञान केंद्र, धुळे आयोजित मधुमक्षिका पालन, पशुपालन व दुग्ध व्यवसाय आणि दुग्ध प्रक्रिया उद्योग, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजना असे प्रशिक्षणे यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
या मेळाव्याच्या तांत्रिक सत्रामध्ये डॉ. मुरलीधर महाजन, कृषि विद्या वेत्ता, विभागीय कृषि विस्तार केंद्र, धुळे यांनी एकात्मिक कापुस लागवड तंत्रज्ञान आणि प्रा. श्रीधर देसले, उद्यानविद्या वेत्ता, विभागीय कृषि विस्तार केंद्र, धुळे यांनी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान याविषयावर मार्गदर्शन केले.
या मेळाव्याचे संपूर्ण संचालन श्री. जगदीश काथेपुरी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.धनराज चौधरी यांनी मानले. शेतकरी मेळावा यशस्विते साठी श्रीमती. अमृता राऊत, डॉ. अतिश पाटील, श्री.जयराम गावित, कु.प्राची काळे, कु. स्वप्नाली कौटे, श्री.स्वप्नील महाजन, श्री. बाळू वाघ, श्री. रमेश शिंदे, श्री. मधुसूदन अहिरे यांचे सहकार्य लाभले.