दैनिक चालू वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
नंदुरबार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘कोविड 19’ या साथरोगामुळे मृत्यू पावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एस.डी.आर.एफ ) मधून 50 हजार रुपयांचे अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री या समितीच्या अध्यक्षा आहेत.
‘कोविड-19’ मुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा नातेवाईकाला अर्थसहाय्याबाबत काही तक्रार असल्यास त्यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती सदस्य सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक हे प्राप्त तक्रारींच्या नोंदी स्वतंत्र नोंदवहीमध्ये घेवून समितीकडे सादर करतील. ‘कोविड-19’ मृत्यूच्या प्रमाणपत्रासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास सदर व्यक्तीची समितीकडे तक्रार दाखल करुन घेणे, ‘कोविड-19’ मृत्यूसाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर मृत्यू कोविड 19 मुळेच झाल्याचे स्पष्ट करणे, संबंधित रुग्णाला ज्या रुग्णालयात दाखल केले गेले आणि उपचार दिले गेले, त्या रुग्णालयाचे आवश्यकतेनुसार मृत व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्या मार्फत किंवा रुग्णालयाकडून कागदपत्रांची पडताळणी करणे.
नोंदणी प्राधिकरण तक्रार निवारण समितीच्या निर्देशानुसार मृत्यू प्रमाणपत्राला मान्यता तसेच सुधारणा करणे, तक्रार निवारण समितीत मृत रुग्णाच्या समकालीन वैद्यकीय नोंदींची तपासणी करुन समितीकडे दाखल तक्रारी अर्जावर समिती 30 दिवसांच्या आत निर्णय घेईल. जर समितीचा निर्णय तक्रारदाराच्या बाजूने नसेल, तर त्याचे स्पष्ट कारण समितीमार्फत कळविण्यात येईल. जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार, जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक (मेडिसिन विभाग) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार हे समितीत सदस्य असतील, तर जिल्हा शल्यचिकित्सक हे सदस्य सचिव असतील.