दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
देहूमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करु न दिल्याने राज्यातील राजकारण बरंच तापलं आहे.
मात्र, आता याबाबत देहूमधील कार्यक्रमाचे आयोजक आणि भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी या संपूर्ण प्रकाराबाबत आता स्पष्टीकरण दिलं आहे.
‘स्वत: माननीय पंतप्रधानांनी उपमुख्यमंत्री अजितदादांना विचारणा केली होती की, आपण बोलू इच्छित आहात का? पण त्यावेळी अजितदादांनी नकार कळवला.’ असं स्पष्टीकरण तुषार भोसले यांनी दिली आहे.
तुषार भोसले म्हणाले
‘पंतप्रधान मोदींचं इतकं सुंदर भाषण ऐकून सर्व वारकरी अत्यंत आनंदीत झाले आहेत आणि खुश झालेले आहेत. वारकरी हे पंतप्रधानांचं भाषण ऐकण्यासाठी आले होते. त्यामुळे वारकरी अत्यंत प्रसन्न होऊन आपआपल्या घरी परतत आहेत. हीच यातून आनंदाची बातमी आहे. दुसरं काही नाही.’ असं तुषार भोसले यावेळी म्हणाले.
प्रोटोकॉल तुटला असं म्हणता येणार नाही. देहू देवस्थानने पंतप्रधान मोदींना आमंत्रित केलं होतं. अजितदादा पवार हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. पंतप्रधान महोदयांच्या व्यस्त कार्यक्रमाची रुपरेषा आणि त्यातून कोणी किती बोलावं हे पंतप्रधान कार्यालय ठरवत असतं. पण आपण जर हा कार्यक्रम टीव्हीवर पाहिला असेल तर स्वत: माननीय पंतप्रधानांनी उपमुख्यमंत्री अजितदादांना विचारणा केली होती की, आपण बोलू इच्छित आहात का? पण त्यावेळी अजितदादांनी नकार कळवला आणि नंतर माननीय पंतप्रधान याठिकाणी भाषणाला उभे राहिले.’ असं तुषार भोसले यांनी नेमकं काय घडलं ते सांगितलं.
‘सुप्रिया सुळे किंवा शिवसेनेची लोकं असतील त्यांना असं वाटतं की, आम्ही म्हणजे महाराष्ट्र.. असं होत नाही.. ते म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र म्हणजे वारकरी आहेत आणि वारकरी अतिशय आनंदात घरी गेले आहेत. त्यामुळे माननीय मोदीजींचं भाषण सर्वांना आवडलं आहे. त्यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी सुप्रिया सुळेंनी अजिबात प्रयत्न करु नये.’ असं प्रत्युत्तर तुषार भोसले यांनी दिलं आहे.
यामध्ये प्रोटोकॉलचा प्रश्नच येत नाही. हा काही सरकारी कार्यक्रम नव्हता. पंतप्रधान मोदींचा हा खासगी कार्यक्रम होता. पंतप्रधानांच्या वेळेनुसार पंतप्रधान कार्यालयाने मांडणी केलेला कार्यक्रम होता. त्यामुळे कोणाला बोलू द्यायचं नाही हे पंतप्रधान कार्यालय ठरवतं. हा काही सरकारी कार्यक्रम नव्हता. पंतप्रधानांना देहू संस्थानाने आमंत्रित केलं होतं. ते पंतप्रधानांनी स्वीकारलं त्यामुळे तो त्यांचा वैयक्तिक असा नियोजित दौरा हौता.’ असं स्पष्टीकरण तुषार भोसलेंनी दिलं आहे.
देहूतील कार्यक्रमात स्टेजवर नेमकं काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज (14 जून) देहूतील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण झालं. यावेळी राज्यभरातून वारकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. त्यानंतर अजित पवारांचे भाषण होईल असे वाटत होते. परंतु सुत्रसंचालकाने थेट नरेंद्र मोदींना भाषणासाठी आमंत्रित केले. स्वत: नरेंद्र मोदींनी अजित पवारांना बोलण्यासाठी आग्रह केला. परंतु अजित पवार तुम्ही बोला म्हणाले.
या सगळ्यानंतर आता एक मोठा वाद सुरु झाला आहे. घडलेल्या प्रकारावरुन भाजपवर सध्या टीकेची झोड उठवली जात आहे.