दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू आहे. राहुल गांधी यांनी ईडी कार्यालयातून बाहेर पडताच मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
भाजप सरकार लष्कराचा अभिमान, परंपरा, शौर्य आणि शिस्तीशी तडजोड करीत आहे, असे केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेबाबत ते म्हणाले.
भारताला दोन आघाड्यांवर आव्हान असताना अग्निपथ योजना सशस्त्र दलांची कार्यक्षमता कमी करू शकते. भाजप सरकारने लष्कराचा अभिमान आणि परंपरेशी खेळणे थांबवावे, असे एका ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणाले. मंगळवारी केंद्र सरकारने लष्करात अग्निपथ योजना सुरू केली आहे. एकीकडे केंद्र सरकारच्या मंत्र्यांपासून लष्करप्रमुखांपर्यंत या योजनेचे कौतुक होत आहे तर दुसरीकडे विरोधक प्रश्न उपस्थित करीत आहेत.