दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
अयोध्या : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.
यावेळी मुंबई महापालिकेत रामराज्य आणण्याचा प्रयत्न करु, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत नशिब आजमावण्यासाठी हा दौरा आहे का? पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, नशिबाची साथ दररोजच असावी लागते. मुंबई महापालिकेची निवडणूक असो किंवा इतर कोणतीही निवडणूक असो प्रत्येक दिवशी आव्हान तर असतचं. चांगल काम करायचं असेल तर रामलल्लाचं दर्शन घ्यावं लागतं आणि त्यानुसार आम्ही महापालिकेत रामराज्यही आणू शकतो.
राहुल गांधींची तिसऱ्या दिवशीही ईडी चौकशी; काँग्रेसचं दिल्लीत हिंसक आंदोलन
दरम्यान, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर भारतीयांकडून विरोध झाला पण आदित्य ठाकरेंना विरोध झाला नाही. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, कोविडच्या काळात उत्तर प्रदेशातील आणि अन्य राज्यातील लोकांना आपण महाराष्ट्रात मराठीजनांसह प्राधान्य दिलं होतं. त्यामुळं कदाचित आम्हाला त्याचा फायदा झाला.
आमच्या भक्तीतच आमची शक्ती आहे आणि हाच आमचा धर्म आहे, असंही यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आमचा हा दौरा भक्तीचा दौरा आहे राजकीय दौरा नाही असा पुनरुच्चार यावेळी ठाकरे यांनी केला.