दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता यावं अशी मागणी करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीसाठी 20 जून रोजी मतदान होणार आहे. न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांनी गुरुवारी सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून उद्यासाठी निकाल राखून ठेवला आहे, त्यामुळे उद्या या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
मलिकांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी यावेळी सांगितले की, हे प्रकरण न्यायालयाच्या कोठडीत असताना मत देण्यासाठी एस्कॉर्टमध्ये जाण्याच्या साध्या विनंतीशी संबंधित आहे. नवाब मलिक हे सध्या रुग्णालयात आहेत आणि तुरुंगात बंदिस्त नाहीत. तसेच त्यांना अद्याप दोषी ठरवण्यात आलेले नाही, त्यामुळे त्यांना मतदान प्रक्रियेतून अपात्र ठरवण्यात आलेले नाही, असे देसाई म्हणाले.
सध्याच्या खटल्यात आवश्यक ती परवानगी देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे, असा युक्तिवादही त्यांनी केला. देसाई यांनी विचारले की, लोकशाहीत एखाद्या खटल्यातील व्यक्तीला (जो निर्दोष असण्याची शक्यता आहे, ज्याच्याविरुद्ध कोर्टातही केस सुरू झालेली नाही) त्याला मतदानाचा अधिकार नाकारला गेला? किंवा त्याला लोकशाही प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले आहे?