दैनिक चालु वार्ता औरंगाबाद
प्रतिनिधि मोहन आखाडे
वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून लौकिक असलेल्या शिऊर ग्रामपंचायतीकडे १५ व्या वित्त आयोगाचा निधी असूनही विकासकामे होत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी दिनांक २१ रोजी शिऊर ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
शिऊर ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाने गावाची धुरा हाती घेतली, यात बाळा पाटील जाधव यांच्यासह काही सदस्य विरोधी बाकावर आहेत.
१५ वा वित्त आयोगाचा निधी उपलब्ध झाला असून हा निधी खर्च करत गावात विकासकामे करण्यात यावे या बाबत आम्ही मासिक बैठकीत आग्रही भूमिका मांडत आहोत, मात्र याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करण्यात येत आहे. सत्ताधाऱ्यांना गावचा विकासाबद्दल अनास्था असून शिऊर गावात नाली, रस्ते, लाईट याबाबत नियोजन करून विकास कामे करण्यात यावे अशी आमची भूमिका आहे, गावाच्या विकासासाठीचे सत्ताकेंद्र असणारे ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावून सत्ताधारी गटाचे लक्ष वेधत विकासकामे सुरू करावे अशी मागणी विरोधक सदस्यांनी केली.
या पैकी बाळा पाटील जाधव, सुनील खांडगौरे, सदस्य पती विजय झिंजुर्डे, माजी सदस्य बाळू पवार, अकबर शेख, लड्डूभाई, शुभम सोनवणे, अर्षद शेख, रामेश्वर निकम, आसिफ पठाण, समीर पठाण, दीपक जाधव, आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
जनतेच्या आशिर्वादाने शिऊर ग्रामपंचायत निवडणूकित ऐतिहासिक विजय मिळवत पत्नीसह स्वतः ग्रामपंचायत सदस्य म्हणून सभागृहात गेलो.
निवडणूक होऊन १० महिने उलटून गेले , विकासाचे राजकारण करण्यासाठी आम्ही सभागृहात आहोत, आम्ही विरोधी बाकावर असल्याने गावात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत , गावातील रस्ते, नाली, लाईट, आदी समस्या तोंड वासून उभ्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी १५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून निधी देखील उपलब्ध झाला आहे, मात्र सत्ताधारी लोकांची अनास्था व काही लोकांची लुडबुड व राजकीय स्वार्थमुळे विकासाला खीळ बसली आहे, आम्हाला ज्या हेतूने मायबाप जनतेने सभागृहात पाठवले आहे ते काम करायला जाणीवपूर्वक खो घातला जात असून या मुळे आम्ही उद्विग्न आहोत.
या सत्ताधारी लोकांना या बाबत मासिक बैठकीत कित्येकदा विनंती केली मात्र तोंडाला पाने पुसली गेली. या गोष्टीचा निषेध करत आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकली आहे
बाळा पाटील जाधव
सदस्य : ग्रामपंचायत शिऊर