दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी- आकाश नामदेव माने
पाऊस हा आनंद घेऊन येणारा ऋतु आहे. या दिवसात निसर्ग हिरवाईन नटून जातो. जिकडे पाहावे तिकडे पाणीचपाणी दिसते. अशा या सुखद वातावरणात निसर्ग भ्रमण करण्याची मजा काही औरच असते. मात्र पावसाचा आनंद घेत असताना सुरक्षा विषयक दक्षताही घेणेही खूप गरजेचे असते. या काळात वीज कोसळणे, पूर, विविध साथरोगही येतात. त्यामुळे पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळयात वादळ, मेघगर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना बाहेर जाणे टाळावे. मोकळ्या जागेत असल्यास आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जावुन गुडघ्यात डोके घालून बसावे. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. घराची बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये. घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्वरीत बंद करावीत.
हे करु नये –आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाइन दुरध्वनीचा वापर करु नये. शॉवरखाली आंघोळ करु नये. घरातील बेसिनचे नळ, जलवाहिनीला स्पर्श करु नये. कुठल्याही विद्यु त उपकरणांचा वापर करु नये. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे सुरु असताना लोखंडी धातूच्या साहाय्याने उभारलेल्या तंबू, शेड, उंच झाडाच्या खाली आसरा घेवू नये. धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नये. घरात असाल, तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
माहिती घ्या, अफवा टाळा — पूर येण्यापूर्वी नागरिकांनी व्हॉटस्ॲप किंवा इतर समाज माध्यमांवर कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये. आपत्कालीन परिस्थितीसाठी एसएमएसचा उपयोग करावा. आपला मोबाईल चार्ज करुन ठेवावा. हवामानातील बदलांची अद्यायावत माहिती रेडिओ, टी.व्ही.वर पाहत रहावी. गुरेढोरे, पशुंच्या सुरक्षिततेची सोय सुनिश्चित करुन घ्यावी.
आवश्यक वस्तूसह आपत्कालीन कीट तयार ठेवावी. आपली कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू जलरोधक पिशवीत जवळ ठेवावे. जवळपास असलेली निवारा, पक्के घराकडे जाण्यासाठी सुरक्षित मार्ग जाणून घ्यावा. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशनाचे पालन करावे. कमीत कमी एका आठवड्यासाठी पुरेसे खाण्याजोगे अन्न आणि पिण्यासाठी पाणी साठवा, पूर असलेल्या क्षेत्रातील कालवे, नाले, ड्रेनेज वाहिन्यापासून नागरीकांनी सतर्क राहावे.
पूर आल्यास घ्यावयाची खबरदारी — पूर पहायला जाण्याचा मोह टाळावा. पूर परिस्थितीत मदतकार्य सुरु असताना त्यात अडथळा येईल असे वर्तन करु नये. पूर प्रवाहात प्रवेश करु नये. सिवरेज लाईन, गटारे, नाले, पूल, नदी, ओढे इत्यादी पासून दूर रहावे. विद्युत खांब आणि पडलेल्या वीज लाईन पासून दूर रहावे. ओपन ड्रेनेज किंवा धोक्याच्या ठिकाणी चिन्हे (लाल झेंडे किंवा बॅरीकेड्स) सह चिन्हांकित करा. पुराच्या पाण्यामध्ये चालू नका किंवा गाडी चालवू नका. लक्षात ठेवा, दोन फूट वाहणारे पुराचे पाणी मोठ्या मोटारींना सुध्दा वाहून नेऊ शकते. ताजे शिजलेले किंवा कोरडे अन्न खावे. आपले अन्न झाकून ठेवा. उकळलेले, क्लोरीन युक्त पाणी प्यावे. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जंतूनाशकाचा वापर करावा.
पूर ओसरल्यावर आरोग्याची काळजी घ्या — पूर येऊन गेल्यानंतर मुलांना पुराच्या पाण्यामध्ये किंवा जवळपास खेळू देऊ नका. कोणतीही खराब झालेली विद्युत वस्तू वापरु नका, त्यापूर्वी तपासणी करा. सूचना दिल्या असल्यास, मुख्य स्विचेस आणि विद्युत उपकरण बंद करा तसेच ओले असल्यास विद्युत खांब आणि तारे, तीक्ष्ण वस्तू आणि मोडतोड अथवा पडझड झालेल्या वस्तूंपासून सावध रहा. पुरातील पाण्यात वाहून आलेले अन्न खाऊ नका. मलेरियापासून बचाव करण्यासाठी डासांच्या जाळीचा वापर करा. सापांबद्दल सावधगिरी बाळगा कारण पुरामध्ये सर्पदंश होण्याची शक्यता असते. जर गटार लाईन फुटली असेल तर शौचालयाच्या किंवा पिण्याच्या पाण्याचा नळ वापरु नका. आरोग्य विभागाने सांगितल्याशिवाय नळाचे पाणी पिऊ नका.
पावसाळयात वरील सर्व काळजी घेतल्यास पावसाचा ऋतु निश्चितच सुखद ठरेल.