
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : आज पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणूकीत एकनाथ खडसे यांना पहिल्या क्रमाकांची २७ मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयानंतर एकनाथ खडसे यांनी मिळालेली अतिरीक्त मते ही माझ्या भाजपमधल्या मित्रांनी दिली असे म्हटले आहे.
राष्ट्रवादीकडं फक्त ५१ मतं होते तरी आम्हाला ५८ मते मिळाली ज्यापैकी २९ मते मला मिळाली असे खडसे यांनी सांगितले.जी काही मते मिळाली असतील ते मला भाजपमधल्या मित्रांनी दिले असावेत असा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील या नेत्यांनी मला संधी दिली या संधीचं मी सोनं करेल, पुर्वीपेक्षा बोलायला अधीक संधी आणि वेळ आहे, असे त्यांनी सांगितले.
गेल्या सहा वर्षात खूप छळवणूक झाली. ईडी वगैरे तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लावला. मंत्रिपदावर असताना खोटे आरोप माझ्यावर झाले राजीनामा घेण्यात आला. आरोप खोटे ठरले, झोटिंग अहवाल आला, तिथेही काही नाही मिळालं. त्यानंतर ईडी चौकशी झाली, जावयाला अटक करण्यात आली. बायको, मुलींना समज देण्यात आली. प्रॉपर्टी जप्त करण्यात आली. अगदी तीन आठवड्यापूर्वी आदेश ईडीकडून काढण्यात आला, माझी राहती घरं खाली करण्याचे आदेश देण्यात आले. मला बेघर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
माझ्या सर्व खात्यातील सर्व पैसे काढले, एकूण एक पैसा काढून घेतला. अजून छळ थांबलेला नाही. राजकारणातून मला संपवण्याचा प्रयत्न केला जात असताना असताना राष्ट्रवादीने पुनर्वसन केलं. ईडी-सीडीचा विषय योग्य वेळी काढेन, विधानपरिषदेत अनेक विषय मांडणार. राष्ट्रवादीला वाढवण्यासाठी मदत करणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.