दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
ठाकरे सरकारवरील संकट अधिक गडद ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे सत्ता टिकविण्याचे आता आव्हान?
मुंबई: महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेत बंडखोरी झाली आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने ठाकरे सरकारवरील संकट अधिक गडद झाले आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांना समर्थन देणाऱ्या तब्बल 26 आमदारांना सुरतमधील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यात शिवसेना आणि ठाकरे सरकारला पाठिंबा देणाऱ्या अनेक अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे सत्ता टिकविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीनंतर विधानपरिषद निवडणुकीतही महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षांच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचं समोर आलं होतं. विधानसभेत भाजपचे 106 आमदार आहेत. अपक्षांसह ही संख्या 113 पर्यंत पोहोचली होती. पण भाजपने राज्यसभा निवडणुकीत 123 आणि विधान परिषद निवडणुकीत 134 मते मिळवली होती. अशातच अगदी दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी उघडपणे बंडाचा झेंडा फडकावला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर राजकीय पेच निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र विधानसभेचं नेमकं गणित काय?
महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 सदस्य आहेत. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी 145 आमदारांची गरज आहे. शिवसेनेच्या एका आमदाराचा मृत्यू झाल्याने आता 287 आमदार उरले असून सरकार स्थापन करण्यासाठी 144 आमदारांची गरज आहे. बंडखोरीपूर्वी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला 169 आमदारांचा पाठिंबा होता, तर भाजपकडे 113 आमदार आणि 5 अन्य आमदार विरोधी पक्षात होते.
महाविकास आघाडीचे संख्याबळ किती?
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 169 आमदारांचा पाठिंबा होता. यात शिवसेनेच्या 56, राष्ट्रवादीच्या 53 आणि काँग्रेसच्या 44 आमदारांचा समावेश आहे. याशिवाय सरकारला सपाचे 2, पीजीपीचे 2, बविआचे 3 आणि 9 अपक्ष आमदारांचा पाठिंबा होता.
भाजपचे 113 आमदार
महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपला 113 आमदारांचा पाठिंबा आहे. यामध्ये भाजपचे 106, रासप 1, जेएसएसचे 1 आणि 5 अपक्षांचा समावेश आहे.
विधानसभेत इतर पक्षांचे 5 आमदार आहेत. यामध्ये AIMIM चे 2, CPI(M) 1 आणि मनसे चां 1 आमदारांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढले होते, मात्र सत्तेसाठी दोन्ही पक्षांचे मार्ग वेगळे झाले होते. शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसोबत सरकार स्थापन केलं होतं. यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. ज्यानंतर या सरकारला आता अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत.
मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचे अनेक बडे नेते महाविकास आघाडीचे सरकार लवकरच पडणार असल्याचा दावा करत राहिले. अशा स्थितीत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सरकार पडू शकते का? त्यासाठी महाराष्ट्र विधानसभेतील राजकीय गणित नेमकं कसं असणार आहे हे आपल्याला समजून घ्यावे लागणार आहे. अशा स्थितीत सत्तेचा खेळ बनवण्यात आणि बिघडवण्यात अपक्षांसह अन्य छोट्या पक्षांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे.
महाराष्ट्रात लहान पक्ष आणि अपक्षांच्या आमदारांची संख्या 29 आहे. यातील काही छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार भाजपसोबत तर काही महाविकास आघाडीसोबत आहेत. भाजपला 113 तर विकास आघाडीकडे 169 आमदारांचा पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला 31 आमदारांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे.
एकनाथ शिंदेंसोबत कोण-कोण आमदार गुजरातमध्ये?
ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांसह एकनाथ शिंदे यांच्याकडे 26 आमदार असल्याचा दावा केला जात आहे. शिवसेनेकडून प्रकाश सर्वे, महेश शिंदे, संजय शिंदे, संजय बांगर, अब्दुल सत्तार (मंत्री), ज्ञानेश्वर चौगुले, शंभूराज देसाई (मंत्री), भरत गोगावले, संजय राठोड, डॉ. संजय रायमुलकरी यांचा समावेश आहे. अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हेही आहेत. आमदारांसोबत शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत.
एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं गणित असं बिघडवले!
एकनाथ शिंदे यांच्यासोबत 26 आमदार असल्याचं समजतं आहे. अशा परिस्थितीत 26 आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास त्यांच्याकडे फक्त 143 आमदार उरतात. अशा स्थितीत अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांचे 2 ते 3 आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास ठाकरे सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करणे कठीण ठरणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी ही बहुमताच्याही खाली आली आहे
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार हे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकी दाखवून एक यशस्वी फॉर्म्युला तयार केला होता. मात्र ज्या प्रकारे आता फाटाफूट झाली ते पाहता ठाकरे सरकारवर सत्ता गमावण्याचं संकट आलं आहे. राष्ट्रवादीचे दोन आमदार तुरुंगात असल्याने त्यांना राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता आले नाही. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारची चिंता वाढवली असून आता उद्धव ठाकरे हे आपलं महाविकास आघाडीचं सरकारला कसे वाचवतात हे पाहन खूपच रंजक ठरणार आहे.