
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर / प्रतिनिधी
ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 मधील प्रकरण क्रमांक पाच कलम 74 ते 81 मधील तरतुदींना अधीन राहून ग्राहक पंचायत महाराष्ट्र आता मध्यस्था (मेडियटर)च्या भूमिकेत येणार असल्याचे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी केले आहे.
ग्राहक संघटनेचे प्रणेते, ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या अथक परिश्रमानंतर या संघटनेचा देशभरात विस्तार झाला असून, या कार्याला लोकमान्यता, राजमान्यता आणि
न्यायमान्यता प्राप्त झालेली आहे. त्यामुळे संघटनेच्या कार्याची विश्वसनीयताही वाढली आहे. परिणामी संघटनेच्या कार्यकर्त्यांना एमईआरसी, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, जिल्हा ग्राहक आयोग, बीएसआय, रेल्वे उपभोक्ता आदी विविध शासकीय व्यवस्थेमध्ये प्रतिनिधित्व प्राप्त झालेले आहे.
शासनाने जिल्हा ग्राहक आयोगांमध्येही मध्यस्थ कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्याद्वारे ग्राहकांच्या प्रलंबित केसेस तातडीने मार्गी लावण्याच्या त्याचा हेतू आहे.
“व्यापक ग्राहक हितार्थ सामंजस्याने, विद्यमान आणि भावी समस्या सोडविण्याचा हा एक प्रयत्न नक्कीच केला जाऊ शकतो. ग्राहक संरक्षण कायदा, 2019 मध्ये अशा स्वरूपाची तरतूद – Mediation – आहेच.
शासनानेही या मध्यस्थ कक्षात संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देऊन या प्रलंबित केसेस मार्गी लावाव्यात असे आवाहन डॉ. लाड यांनी केले आहे.