
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -किशोर वाकोडे
दि.२५.गुवाहाटीत पळून गेलेल्या फुटीर आमदारांमध्ये सध्या कमालीची अस्वस्थता आणि चलबिचल आहे. दिवस जाताहेत तसा अनेकांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळेच फुटीर गटाचे म्होरक्या असलेले एकनाथ शिंदे यांना वारंवार संयमाचे आवाहन करावे लागत आहे. मतदार संघातील वाढत्या असंतोषामुळे फुटीर आमदारांवर दबाव वाढत आहे. कुटुंबीय धास्तावलेल्या मानसिकतेत आहेत. गद्दारीचा शिक्का, पैसे खाऊन विकले गेल्याचा आरोप होत असून कुटुंबाला घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. “आम्ही इथे काय अवस्थेत जगतोय आणि तुम्ही तिकडे मजा मारताय,” असे प्रश्न कुटुंबियांकडून विचारले जात असल्याने फुटीर नेते चिंताग्रस्त झाले आहेत. काही लोकांनी स्वत:ला चौकशीच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी आपली दिशाभूल केली, अर्धवट माहिती दिली, आपल्याला फसविले गेले, वापरले जात आहे, ही भावना फुटीर आमदारांमध्ये वाढत चालली आहे. मतदारसंघात वाढता विरोध, आक्रमक झालेले सर्वसामान्य शिवसैनिक, जागोजागी गद्दारीचा निषेध, विष्ठा खाल्ल्याचे आरोप, कार्यालयावर हल्ले, पुतळा दहन… त्यातच पद राहील की जाईल, हा संभ्रम. आता हे सारे नेमके केव्हा संपेल याबाबत कमालीची अनिश्चितता या सर्वांमुळे फुटीर आमदारांत
याच वैफल्यातून काल रात्री गुवाहाटीत जोरदार अंतर्गत वादावादी झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
“हे सारे केव्हा संपेल,” या फुटीरांच्या प्रश्नावर म्होरक्याकडे नेमके व निश्चित उत्तर नाही. “सगळे सुरळीत होईल, घाबरु नका, आपलेच सरकार येईल,” या म्होरक्याच्या कोरड्या व फुसक्या उत्तरावर फुटीर आमदारांचे समाधान होत नाहीये. आता पद राहिलेच तर “प्रहार”सोबत जाऊन बसायचे का मग? हा हतबल प्रश्न फुटीर उपस्थित करीत आहेत. आपला स्वतंत्र गट आणि तीच खरी शिवसेना राहील, हे दाखवलेले स्वप्नही फुसकाट ठरताना दिसत असल्याने फुटीर आमदारांमध्ये असंतोष उफाळू लागला आहे. त्यातच महाशक्ती कुठेही नेमकेपणाने मैदानात दिसत नाही. कायदेशीर लढाई लांबतांना दिसताच महाशक्तीने हात वर केल्याच्या भावनेने फुटीर आमदार आणखी धास्तावले आहेत. त्यातील एकाने प्रश्न केला, “राज्यपालांना कोरोना लागण झाली व ते राजभवनाबाहेर गेले, तेव्हाच काहीतरी गडबड आहे, हे एव्हढे सोपे नाही हे जाणवले. तुम्ही आम्हाला सत्य का सांगत नाही. काय लपवत आहात, नेमके काय होणार आहे आमचे आता?”
४७ ते ७२ तासात सारे आटोपून आपले नवे सरकार महाशक्तीसह सत्तेत येईल, असे फुटीर आमदारांना आधी सांगितले गेले होते. सुरतेतूनच दुसऱ्याच दिवशी मुंबईत आणून राज्यपालांसमोर जाऊन परेड केली जाईल, निर्धास्त राहा, असे फुटीर आमदारांना सांगितले गेले होते. अगदी गरज लागलीच तर, काही आकस्मिक प्रसंग उद्भवला तर प्लान बी म्हणून गोव्यात किंवा कर्नाटकात नेण्याचा विचार होता. मात्र, ऐनवेळी फुटीर आमदारांना रातोरात महाशक्तीचा बालेकिल्ला असलेल्या सुरतेहून आसामात हलविण्यात आले. तेथे आधीच बुकिंग करण्यात आले होते वैगेरे सर्व बातम्या प्राईस टॅग लावलेल्या गोदी मीडियाला हाताशी धरून पेरण्यात आल्या. प्रत्यक्षात हे पाऊल अचानक, नाईलाजास्तव उचलावे लागले. कारण फुटीर आमदार अचानक रातोरात आल्याने गुवाहाटीतील हॉटेलला दुसऱ्या दिवसापासूनची अनेक इतर ग्राहकांचे बुकिंग रद्द करावे लागल्याची सूत्रांची माहिती आहे. अनेक ग्राहकांचे ऑनलाईन बुकींग असल्याने त्यांना ऑनलाईन रिफंड अदा केला गेला आहे. काही प्रमुख पर्यटक कंपन्यांचे ग्रुप बुकिंग कॅन्सल करावे लागले आहे. त्यामुळे आसाम बुकिंग हे पूर्वनियोजित असल्याचा गोदी मीडियामार्फत पसरवलेला परवा तद्दन फोल आहे.
याच मुद्द्यावरून काही फुटीर आमदारांनी काल रात्री फुटिरांच्या म्होरक्याच्या खास माणसांशी हुज्जत घालून जोरदार वादावादी केली. “आम्हाला फक्त 2 दिवसांचा खेळ आणि सुरतेहून मुंबई राज्यपालांसमोर सांगितले आणि आता इथे आसामात आणून टाकलंय. तिकडे आमच्या बायका-पोरांना जगणं मुश्कील झालंय आणि तुमचा काय टाईमपास चाललाय? होत नसेल, तुमच्या बसकी बात नसेल तर सांगा, जातो आम्ही परत, उद्धवसाहेबांची माफी मागतो तिकडे जाऊन. इथे आहे ती आमदारकी जायची वेळ आली आहे,” अशा शब्दात बाचाबाची झाली. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण सोडविले गेल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यातच आसामचे मुख्यमंत्री कितीही पर्यटनाला या सांगत असले तरी फुटीर आमदार पर्यटनाच्या मन:स्थितीत नाहीत. त्यांना फोन जमा करून गटाने सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीत फिरायला जायची, पर्यटनाची परवानगी आहे. मात्र, पुराने व महागाईने वैतागलेले स्थानिक नागरिक, तृणमूल कार्यकर्ते, बंडखोर व नक्षलवादी गट यांच्याकडून हल्ला होण्याची, मारहाणीची भीती असल्याने फुटीर आमदार बाहेर पडायला घाबरत आहेत. हॉटेलातील चार भिंती कितीही पंचतारांकित असल्या तरी चार दिवस त्या भिंतीत डांबले जाऊन फुटीर आमदारांचा जीव आता गुदमरायला लागला आहे. त्यातच आता स्थानिक पातळीवर फुटिरांविरोधात असंतोष, नाराजी, राग वाढत चालला आहे. गुवाहाटीतील हॉटेलवरच आता हल्ला होण्याची भीती आहे. त्यामुळे स्थानिक महाशक्तीने लवकरात लवकर फुटिरांना इथून हलवा, अशी विनंती वरिष्ठांकडे केली आहे.