
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : देशभरातून प्रचंड विरोध होत असलेल्या केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवर काँग्रेस सातत्याने टीका करत आहे. या योजनेविरोधात काँग्रेसने सोमवारी उत्तर प्रदेशातील सर्व विधानसभा मतदारसंघात सत्याग्रह केला.
दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे.
विमानतळ देऊन मित्रांना श्रीमंत बनवले’
केंद्राच्या अग्निपथ योजनेवरून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधान आपल्या मित्रांना 50 वर्षांसाठी देशातील विमानतळे देऊन ‘दौलतवीर’ बनवत आहेत आणि तरुणांना केवळ 4 वर्षांच्या करारावर ‘अग्नीवीर’ बनवले जात आहे. आज अग्निपथविरोधात काँग्रेस देशभरात सत्याग्रह करत आहे. जोपर्यंत तरुणांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा सत्याग्रह थांबणार नाही,’ असे ट्विट राहुल यांनी केले.
यूपीत काँग्रेसचा सत्याग्रह
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ सोमवारी उत्तर प्रदेशातील सर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्ते सत्याग्रह करत आहेत. प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते विकास श्रीवास्तव यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सैन्यात भरतीसाठी आणलेल्या अन्यायकारक तुघलकी अग्निपथ योजनेला उत्तर प्रदेश काँग्रेस जोरदार विरोध करत आहे. प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी प्रियांका गांधी यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा-शहर अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शांततेत सत्याग्रह करण्यात आला.