दैनिक चालू वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदीप मोरे
नंदुरबार: बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले.
नंदुरबार येथील शिवाजी नाट्य मंदिर येथे कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत देशपाडे, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक प्रमोद पाटील तसेच विविध बॅकांच्या प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती खत्री म्हणाल्या की, भारत सरकार वित्त मंत्रालय यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यामध्ये बँकेमार्फत 16 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत क्रेडिट आउटरिच अभियानाचे मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार असून या अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा. कृषी विभागाच्या आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्जाची व ते घेण्यासाठी आवश्यक प्रक्रीयेची माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या हस्ते वाघेश्वरी महिला बचत गट, खामगाव, यश महिला स्वंयम संस्था समुह, वैदाणे, सुवर्णा महिला स्वंयम सहायता बचत गट, वैदाणे, नवनाथ कृपा महिला स्वंयम संस्था समुह, रंजाळे, भानुबाई खंडोबा महिला स्वंयसहायता समुह, वटबारे, एकलव्य महिला स्वयंम संस्था समुह, मंजारे, भवानी माता स्वंयम सहायता समुह, खामगाव, राम मंदिर महिला स्वंयम सहायता समुह, वावद, श्री स्वामी समर्थ महिला स्वंयम सहायता, खोक्राळे, वैष्णवी महिला स्वंयम संस्था, बोराळे, प्रियाशू महिला बचत गट, नंदुरबार अशा 11 महिला बचत गटाना 15 लाख 28 हजार रुपयांचे कर्ज मंजूरीच्या आदेशाचे वितरण करण्यात आले. तसेच सुभाष पाटील यांना 2 लाख 51 हजार, कांन्तीलाल पाटील 1 लाख 50 हजार, अंबालाल पाटील 1 लाख 50 हजार तर शुभम पाटील यांना 2 लाख 90 हजार रुपयांचे पीककर्ज मंजूरीचे आदेश वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी बॅंकेमार्फत लावण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेट देवून माहिती घेतली.
जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत देशपाडे यांनी सांगितले, या मेळाव्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड, एमएसएमई व रिटेल ग्राहकांसाठी बँकांच्या कर्जसुविधा, स्टॅन्डअप इंडिया, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री स्वय निधी योजना, कृषी पायाभूत निधी योजना, सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, पीएमईजीपी, सीएमईजीपी तसेच अन्य केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजना, कृषी पायाभूत सुविधा, पशुपालन इन्फ्रास्ट्रक्चर विकास निधी योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना आणि जनधन योजना, पीक कर्ज योजना या सारख्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार असून यासाठी जिल्हाभरात मेळावे घेण्यात येणार आहे. मेळाव्यातून विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन देण्यात येणार असल्याने या अभियानाचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. या मेळाव्यात जिल्ह्यातील 14 बँकेच्या प्रतिनिधींनी स्टॉल लावले होते. मेळाव्यास मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.