दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
बीड- महसुल विभागातील सर्वात महत्वाचा घटक असलेल्या तलाठी, मंडळाधिकारी यांनी गेल्या काही दिवसांपासून संप पुकारल्याने जिल्हाभरातील महसुलची कामे ठप्प झाली आहेत. शेतकऱ्यांना लागणाऱ्या ७/१२ सह अन्य सर्व कामे पेंडींग पडल्यान पुढील कामांवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित संघटनेशी चर्चा करून मार्ग काढावा अशी मागणी शेतकऱ्यांमधुन होऊ लागली आहे. बीड जिल्ह्यातील तलाठी, मंडळाधिकारी गेल्या काही दिवसांपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत. ई फेरफार, ई-चावडी वाचन तसेच ई-पिक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी महसुल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषा वापरून अपमानित केल्याने संतप्त तलाठी, मंडळाधिकाऱ्यांच्या संघटनेने जगताप यांच्या बदलीसह अन्य मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलेला आहे. आत्तापर्यंत तलाठ्यांनी केलेले ऑनलाईन कामातील योगदान, ऑनलाईन कामकाजासाठी वाचवलेले पैसे आदि मुद्यांचा विचार होणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून हा संप सुरू असल्याने जिल्हाभरातील महसुलची कामे ठप्प झाली आहेत. संपाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसु लागला आहे. ७/१२ देखील मिळत नसल्याने अनेक अडचणी वाढल्या आहेत.