दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
यंदा हवामान खात्याने प्रारंभी पासून चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली होती मात्र जून संपून जुलै महिना प्रारंभ झाला असून अद्याप पर्यंत म्हणावा तसा पाऊस झाला नसला तरी प्रारंभीच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. तसा सतत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने पेरणी केलेली पिके कोळपणीला आले असताना हरणांच्या कळपाने कोमाऱ्यात आलेल्या सोयाबीन व कापशी पिकांवर डल्ला मारल्याने लोहा तालुक्यातील पांगरी शिवारातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
तालुक्यातील पांगरी शिवारातील शेतकऱ्यांनी नगदी खरीप पीक म्हणून सोयाबीन पिक घेतले आहे. तसेच कपाशीची लागवड देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. अद्याप मोठा नसला तरी प्रारंभीच्या हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसावर बळीराजाने पेरणी उरकून घेतली असून सद्यस्थितीत सोयाबीन, कापशी तसेच इतर पिके पहिल्या कोळपणीला आले असताना पांगरी शिवारातील जवळपास चाळीस हेक्टर वरील उभे पिक हरणांच्या कळपाच्या भक्ष्यस्थानी पडले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याचे पांगरी येथील शेतकरी नागनाथ पांडूरंग बुद्रुक, विठ्ठल मारोतराव बुद्रुक, लक्ष्मण नऱ्होजी बुद्रुक, सतीश माधवराव बुद्रुक, राजेश श्रीराम येरमवार, रमाकांत विठ्ठल येरमवार, रामराव मारोतराव बुद्रुक, व्यंकटी माणिका बुद्रुक आदींनी सांगितले.
पांगरी शिवारात जवळपास दोनशे ते तीनशे हरणांचा कळप आहे. एखाद्या शेतातील पिकात हरणांचा कळप घुसल्यास कांही तासात शेतातील अख्खे पीक फस्त होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. दिवसरात्र पाऊस असताना देखील पिकांच्या रक्षणासाठी बळीराजावर खडा पहारा देण्याची वेळ आली असल्याचे चित्र दिसून येत आहे. यासंदर्भात वन विभाग, कृषी विभाग तसेच महसूल विभाग देखील लक्ष देत नसल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. संबंधित प्रशासनाने हरणांचा बंदोबस्त करावा तसेच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी पांगरी शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे.
आज घडीला तालुक्यातील हरणांच्या कळपामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान होत असून पारडी,सुनेगांव,पांगरी,शिवणी (जा.),खडकमांजरी,सायाळ,भाद्रा,आंडगाव, बोरगांव (आ.)कारेगाव,हरसद येथील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला असून संबंधित प्रशासनावर रोष व्यक्त करत आहेत.