दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी-प्रमोद खिरटकर
एकिकडे सरकारी शाळेच्या प्रवेशद्वारावर “यावे ज्ञानासाठी,निघावे सेवेसाठी” ही म्हण प्रचलित असून अलीकडे “यावे ज्ञानासाठी, निघावे पैशासाठी” ही वास्तविकता आज समाजात नाकारता येत नाही. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे व ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. मात्र, आजची वास्तविक परिस्थिती बघतांना याच वाघिणीच्या दुधाची किंमत शिक्षणाच्या बाजारात खूप वाढली असून हीच वाघीण आज शिक्षणाचा धंदा करत आहे. शिक्षणाच्या नावाखाली सर्वसामान्यांना लुटणारी धनरागिनी असल्याचे चित्र शिक्षणव्यवस्थेत दिसून येते.
इतिहासाची पाने चाळतांना शिक्षणाची व्याख्या विशद करतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बुद्धीला सत्याकडे,भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजेचं शिक्षण होय. त्याहीपलीकडे सत्य व असत्याची फोड करून सत्याला छातीठोकपणे स्वीकारण्याची ताकद ज्यांच्या अंगी असते तो खरा सृजनशील माणूस.
२१ वे शतक हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आपली शिक्षणव्यवस्था फक्त सुशिक्षित माणूस घडवत आहे, परंतु बुद्धिमत्तेची वाटचाल ही मात्र आजही गुलामीकडे आहे. शिक्षणाचे झालेले व्यवसायिकरण बघता सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, कामगार या वर्गाने मुलांना शिक्षण द्यायचं कसं ? असा पश्न पडतो आणि या शिक्षणाच्या काळ्याबाजारात भरडला जातोय तो म्हणजे फक्त सामान्य वर्ग.
कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांची व्यथा बघतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी कथा डोळ्यासमोर येतात, शेतकरी आत्महत्येची स्मशानभूमी असलेल्या महाराष्ट्रात शेतकरी मुलांना शिकविणार कसा याचा गांभीर्याने विचार मायबाप सरकारने करावा.
सामान्य वर्गातील माध्यमिक शाळेतून मुलगा एका आशावादी ध्येयासह मायबापाचे स्वप्न उराशी बाळगून शिक्षण घेण्यासाठी गावाबाहेर पडतो. शिक्षणक्षेत्रामध्ये सुरू असलेला काळाबाजार तो उघळ्या डोळ्यांनी बघतो आणि शहरातला शिक्षणाचा व राहण्याचा खर्च झेपावनारा नसल्यामुळे व्यवस्थेला दोष देत परत गावी परततो. ही सामान्य ध्येयवादी पोरांची दयनीय अवस्था ही व्यवस्था कधी बदलविणार.
नुकत्याच, विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहे. यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शुल्क दिवसेंदिवस वाढत असून आज लाखोंच्या घरात आहे. यामध्ये शिक्षणाच्या बाजारातील खाजगी दलालांचा फायदा होत असल्याचे चित्र स्पष्ट आहे. त्याचबरोबर नीट, जेईई यासारख्या प्रवेश परिक्षेचे प्रशिक्षण देणारे इस्टिट्यूट यामध्ये दोन वर्षांचे शुल्क तीन लाख, सलग्नीत महाविद्यालयाचे एक लाख आणि वसतिगृहाचे दोन लाख अशा सहा-सात लाख रुपयांची सर्रास लूट विद्यार्थी व पालकांकडून केली जाते.
महाराष्ट्राच्या इतिहासाला समाजसुधारकांचा वारसा लाभलेला आहे. समाजात शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले. यांच्यासोबत शिक्षणाच्या प्रचार व प्रसारासाठी आयुष्य वेचून सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे खुले करून देणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कृतिशील विचार आज समाजापर्यंत पोहचविण्याची गरज आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करतांना विद्यार्थ्यांमध्ये समता व बंधुता, वैज्ञानिक दृष्टीकोन या मूल्यांची पेरणी केली तरचं बहुजन समाजात विवेकवाद जन्म घेईल.
आज शिक्षण हा सर्वात मोठा भांडवलदार वर्गाचा व्यवसाय झाला असून बेरोजगारीमुळे जो तो खाजगी संस्था उघडून गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या नावाखाली फसव्या जाहिराती प्रसिद्ध करून विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करीत आहे व स्वतःला शिक्षणमहर्षी म्हणनून घेणारे सामान्य विद्यार्थ्यांचा गळा दाबत आहे. आजच्या शिक्षणसम्राट नेत्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांचा आदर्श डोळ्यांसमोर घ्यावा व शिक्षणाच्या काळ्याबाजारात वाघिणीच्या दूधाची किंमत कमी करून दिवसरात्र कष्ट करणाऱ्या बापाच्या घामाचा थेंब व अर्थपोटी भाकरीवर झोपणाऱ्या मायेचा काळजाच्या तुकड्याला शिक्षणक्षेत्रातल्या वाघिणीच्या दुधाची चव घेवू द्यावी व पुरोगामी महाराष्ट्रात तिमिरातुनी तेजाकडे नेणारी शिक्षणव्यवस्था निर्माण करावी.